सलग आठ वेळेस 80- 90 हजार मतांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात कसे पराभूत होऊ शकतात ?
राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल
सलग आठ वेळेस 80- 90 हजार मतांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात कसे पराभूत होऊ शकतात ?

राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील मतदार यादी बाबत असलेल्या घोळाबाबत चर्चा केली यावेळी समवेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री जयंत पाटील, गटनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड , आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की विधानसभा मतदानाच्या वेळी मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाला आहे. मतदार याद्या राजकीय पक्षांना दाखवल्या जात नाही निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा नसतो हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. उत्तरे देण्यामध्ये ते टोलवाटोलवी करत आहेत. मतदार यादी सुधारणा होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका असे आवाहन करताना अहिल्यानगर जिल्ह्यातून संगमनेर मतदार संघातून सलग आठ वेळेस 80 ते 90 हजाराच्या मोठ्या मताधिक्याने विजय होणारे बाळासाहेब थोरात या निवडणुकीत पराभूत होतात हे मोठे आश्चर्य आहे. त्यांची सततची कामे मोठा जनसंपर्क लोकांमध्ये त्यांचा वावर आणि समृद्ध केलेला तालुका यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. त्यांच्या अनपेक्षित निकालने महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. विधानसभेतील निकालांबाबत राज्यातील जनतेमध्ये मोठा संभ्रम आहे. याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले पाहिजे असे ते म्हणाले.तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही अनु पहात आहे. व्हीव्हीपॅट नाही, व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही, मग इलेक्शन ऐवजी सिलेक्शन करा. लोकशाही धोक्यात आली असून सुप्रीम कोर्टाने यामध्ये सुमोटो वापरला पाहिजे असे ते म्हणाले तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, निकोप निवडणूक ही लोकशाहीचा पाया आहे .मात्र तो सध्या उध्वस्त होत आहे. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे मात्र त्यांना समाधानकारक उत्तरे देता आले नाही .तर जयंत पाटील म्हणाले की, मतदार यादी मध्ये मोठा घोळ असून एका मतदाराचे अनेक ठिकाणी नाव आहे. यावेळी विजय वडेंटीवार यांसह विविध नेत्यांनी आपली मते मांडली.
महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी मांडलेल्या मतावर निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची सर्व नेत्यांनी म्हटले आहे. आगामी दोन दिवसांमध्ये पुढील रणनीती ठरू असेही ते म्हणाले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जनतेचा कायम पाठिंबा.
यशवंतराव चव्हाण यांचे संस्कृत वारसदार म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो आहे. संगमनेर तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक, सहकार ,कृषी अशा सर्व क्षेत्रांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील तालुक्यांमध्ये गणला जातो. तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करताना त्यांचा शहरात व तालुक्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक कुटुंबात मोठा जनसंपर्क आहे. सतत जनतेमध्ये राहणारा लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे. असे असताना विधानसभेमध्ये झालेला पराभव हा कुणाच्याही पचनी पडलेला नसून हा मोठा घात आहे. अशी शंका संगमनेर तालुक्यासह महाराष्ट्राला पडली आहे. संगमनेरच्या निकालांबाबत राज्यसहदेशांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असून राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संगमनेरसह राज्यातील तरुणाईने आपल्या सोशल मीडियावर लोकनेते बाळासाहेब थोरात यांना जोरदार पाठिंबा दर्शवला आहे.



