दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
वृक्ष संगोपन हीच खरी सेवा

दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

वृक्ष संगोपन हीच खरी सेवा
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले, प्रकल्प प्रमुख सौ.दुर्गाताई तांबे, सभापती शंकरराव खेमनर, सरपंच सोमनाथ गोडसे, गोरख नवले, गोरख सोनवणे, सुभाष सानप, योगेश पवार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, समन्वयक प्राचार्य दशरथ वर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जात असलेले दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली आहे. वृक्षारोपण व संवर्धन ही मानवतेची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने यामधून परमेश्वराची सेवा होणार आहे म्हणून या पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करा. या अभियाना मधून सप्तशृंगी गडावर 100 हेक्टर वर वृक्षारोपण करण्यात आले असून अनेक वृक्ष जगले आहेत याचबरोबर तालुक्यातील विविध डोंगरांवरचे वृक्ष विविध सहकारी संस्थांनी जगवली आहेत. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. याचबरोबर एक विद्यार्थी दोन झाड ही संकल्पना राबवताना प्रत्येक नागरिकांनी वन विभाग गावातील मोकळ्या जागा आणि आपल्या बांधावर सुद्धा जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे आवाहन त्यांनी केले.तर सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, तालुक्यातील सहकारी संस्थांच्या मदतीने वृक्षारोपण व संवर्धनाचे मोठे काम झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी वनवे लावले जात आहे हे अत्यंत चिंताजनक आहे यावर्षीचा उन्हाळा भयानक होता जास्त उन्हामुळे झाडे करपले गेली तरीही अनेक झाडांना पाणी देऊन ते जगविण्यात आली. उन्हाळ्यामध्ये झाडे जगवणे अवघड असून शेतकऱ्यांनी आपल्या जवळील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे असे आवाहन त्यांनी केले.तर गोरख नवले म्हणाले की, वनविभाग किंवा गावाच्या मोकळ्या जागेमध्ये झाडे लावून नरेगा अंतर्गत रोजगाराच्या मोठ्या संधी गावातील महिला व युवकांना मिळू शकतात. बिहार पॅटर्न अंतर्गत रोजगाराची ही मोठी संधी असून यामध्ये प्रत्येक गावच्या सरपंच व नागरिकांनी सहभाग घेऊन गावाला जास्तीत जास्त उत्पादन मिळून द्या याचबरोबर पर्यावरणाचे संवर्धन करा असे ते म्हणाले. तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून वृक्ष जगली पाहिजे ती वाढवली पाहिजे यासाठी काम करा असे आव्हान त्यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले तर पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले.
वनश्री पुरस्काराबद्दल मालदाड गावचा गौरव
मालदाड गावचे सर्व ग्रामस्थ व सरपंच यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व तळमळीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले. हा पॅटर्न आदर्शवत ठरला आहे. वृक्षारोपणामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाली या अंतर्गत 60 लाख रुपयांचा रोजगार गावामध्ये निर्माण झाला. याचबरोबर 14 एकरवर वृक्षरोपण केल्यातून शेवगा, आंबा यामधून गावाला मोठे उत्पन्नही मिळाले या कामाची दखल घेऊन त्यांना वनश्री पुरस्कार मिळाला याबद्दल सरपंच गोरख नवले यांचा मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



