यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमीमुळे मराठी साहित्याला जागतिक दर्जा मिळेल – आमदार आशुतोष काळे

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमीमुळे मराठी साहित्याला जागतिक दर्जा मिळेल – आमदार आशुतोष काळे


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमीमुळे मराठी साहित्याला जागतिक दर्जा मिळेल – आमदार आशुतोष काळे
कोपरगांव । प्रतिनिधी । राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडतांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याची राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली घोषणा ही मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल असून या अकादमीमुळे मराठी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास महाराष्ट्र विधिमंडळ मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेदरम्यान आपल्या भाषणातून व्यक्त करून या निर्णयाचे स्वागत केले आहे.अनेक वर्षांपासून साहित्यिकांकडून अनुवाद अकादमीची मागणी केली जात होती, विशेषतः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या मागणीने जोर धरला होता. महाराष्ट्राकडे साहित्य संग्रहाचा मोठा वारसा आहे. परंतु भाषेच्या मर्यादेमुळे अनेकदा आपले दर्जेदार साहित्य जागतिक स्तरावर पोहोचू शकले नाही. आता या अनुवाद अकादमीच्या माध्यमातून मराठीतील उत्तम ग्रंथ, कविता आणि संशोधनात्मक साहित्य इंग्रजीसह इतर भारतीय भाषा आणि जागतिक भाषांमध्ये अनुवादित केले जावून मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तसेच जगातील आणि भारतातील विविध भाषांमधील उत्कृष्ट ज्ञान आणि साहित्य मराठीत आणले जाणार आहे. त्यामुळे भारतीय प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्तम साहित्य मराठीत उपलब्ध होवून मराठी वाचकांची अभिरुची अधिक समृद्ध होणार असून ज्ञानाचे आदानप्रदान व्यापक होऊन विचारांची देवाणघेवाण वाढणार आहे.

महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापनेचा सर्वात मोठा फायदा मराठी माध्यमातील विद्यार्थी आणि संशोधकांना होणार आहे. विविध तांत्रिक, वैज्ञानिक आणि सामाजिक विषयांवरील जागतिक दर्जाचे ज्ञान जेव्हा मराठीत उपलब्ध होईल तेव्हा मराठी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मोठी मदत होईल आणि संशोधकांसाठी संदर्भांचे नवीन दालन निर्माण होईल. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरु होणारी अकादमी मराठी भाषेला खऱ्या अर्थाने जागतिक ज्ञान भाषेचे स्थान मिळवून देईल. याच बरोबर मराठी भाषा संवर्धन आणि जागतिक दर्जावर पोहचण्यासाठी अनुवाद अकादमी स्थापन करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. सरकारच्या या दूरदृष्टीच्या निर्णयामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या चळवळीला मोठी ताकद मिळून या माध्यमातून साहित्य क्षेत्रात नवीन पर्व सुरू होवून या अकादमीच्या स्थापनेमुळे मराठी भाषेतील साहित्य आणि विचार जगभरात पोहोचवण्यास मदत होणार असल्याचे महाराष्ट्र विधिमंडळ मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.



