शिक्षणाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीत आणा – शालिनीताई विखे पाटील
लोणीत टायगर गृपच्या वतीने सेवाभावी उपक्रम साजरे
शिक्षणाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कृतीत आणा – शालिनीताई विखे पाटील


लोणीत टायगर गृपच्या वतीने सेवाभावी उपक्रम साजरे
लोणी । प्रतिनिधी । “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जतन करून शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती करतानाच, त्यांनी दिलेल्या शिकवणीचे आचरणात रूपांतर करा,” असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

जनसेवा मंडळ आणि टायगर ग्रुप, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमास सरपंच कल्पना मैड, अनिल विखे, टायगर ग्रुपचे लोणी अध्यक्ष अण्णा ब्राह्मणे, सुहास ब्राम्हणे, साईजित बोर्डे, संजय साबळे, अनिकेत खरात, महेश खरात, मयूर वाघमारे, सोनू चोखर, राज चव्हाण, प्रतीक सोनवणे, भारत गायकवाड, विनोद साबळे, किरण गाडेकर, किरण डोंगरे, सौरभ गाडेकर, विलास तुपे, विजय भोसले, मुरली पवार, नारायण थोरात यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या की, “डॉ. आंबेडकरांच्या विचारांनुसार जयंती उत्सव समितीने विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात दिला आहे. जयंतीत डीजेला फाटा देऊन गरजू नागरिकांना शिधावाटप आणि शालेय साहित्याचे वितरण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची अत्यंत गरज असून, ते विचार कृतीत आणणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी घडवलेले सामाजिक परिवर्तन हेच आज समाज एकोप्याने राहण्याचे मुख्य कारण आहे.” त्या पुढे म्हणाल्या की, “जातीपातीच्या राजकारणापलीकडे जाऊन ‘गाव एक आहे’ ही भावना जपणे आणि सामाजिक एकोपा टिकवणे गरजेचे आहे. विखे पाटील परिवार सर्व समाजाला सोबत घेऊन समाजकारणाच्या माध्यमातून विकासाचे कार्य करत आहे. जयंती साजरी करताना केवळ उत्सव साजरा न करता त्यांच्या विचारांचा जागर करून ते प्रत्यक्ष आचरणात आणावेत.”असे आवाहनही त्यांनी केले



