“वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्यांनी आधी माफी मागावी! – ना.विखे पाटील

“वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्यांनी आधी माफी मागावी! – ना.विखे पाटील

“वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्यांनी आधी माफी मागावी! – ना.विखे पाटील
लोणी । प्रतिनिधी । वारकरी संप्रदायाच्या संदर्भात शरद पवार यांनी केलेले लिखाण अत्यंत खेदजनक असून, देव, देश आणि धर्मासाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल केलेल्या शब्दप्रयोगाचा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ज्यांची हयात नास्तिक म्हणून मिरविण्यात गेली त्यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या लिखाणाबद्दल आधी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे की, वारकरी संप्रदायाचा संदर्भ घेऊन शरद पवार यांनी पुरोगामी आणि प्रतिगामी अशा शब्दांचा खेळ करत वारकरी संप्रदायात एकप्रकारे फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अनेक वर्षांची परंपरा असलेला हा वारकरी संप्रदाय अशा लिखाणाने विचलित होणार नाही; उलट हिंदुत्वासाठी संत परंपरेचा वारसा घेऊन एकसंघपणे अधिक जोमाने काम करेल आणि समाजालाही अध्यात्माने बांधून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अहिल्यानगर जिल्ह्यातील ह.भ.प. भास्करगिरी महाराज, आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज आणि ह.भ.प. रामगिरी महाराजांची नावे घुसखोरांच्या यादीत टाकली आहेत. मात्र, या व्यक्तींनी समाजासाठी सर्वस्व अर्पण करून देव, देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित केले आहे. त्यांच्याप्रती ‘घुसखोर’ सारख्या केलेल्या शब्दप्रयोगाचा मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.“वारकरी कधीच निधर्मी होऊ शकत नाहीत; कारण वारकरी परंपरेलाच धर्माचे अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान अशी मते व्यक्त करून दूर करण्याचा केविलवाना प्रयत्न कोणी करत असेल तर तो यशस्वी होणार नाही. प्रत्येक गोष्टीकडे ‘व्होट बँक’ म्हणून पाहणारे लव्ह जिहादपासून ते कॉर्पोरेट जिहादच्या एकाही घटनेवर शब्द सुद्धा बोलत नाहीत; मात्र परखडपणे यावर भूमिका मांडणारे हिंदुत्वनिष्ठ पवारांना वारकरी संप्रदायातील घुसखोर वाटतात, हे अतिशय निंदनीय आहे,” असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील महापुरुषांना आणि हिंदू समाजातील जाती-जमातींना विभागण्यामध्ये ज्यांची संपूर्ण कारकीर्द गेली, त्यांना एकसंघपणे राहिलेला आणि वारकरी समुदायात समाविष्ट असलेला बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती-जमातींमधील समाज एकत्रित राहतो हे पाहावत नसल्याची टीका मंत्री विखे पाटील यांनी केली.




