आयुष्यातून हरवलेला पैसा पुन्हा मिळविता येतो हरवलेली वेळ परत मिळत नाही – प्रा. प्रवीण दवणे

आयुष्यातून हरवलेला पैसा पुन्हा मिळविता येतो
हरवलेली वेळ परत मिळत नाही – प्रा. प्रवीण दवणे


आयुष्यातून हरवलेला पैसा पुन्हा मिळविता येतो
हरवलेली वेळ परत मिळत नाही – प्रा. प्रवीण दवणे
कोपरगांव । प्रतिनिधी । आयुष्यात पैसा आणि वेळ या दोन्हीही गोष्टी माणसांसाठी आवश्यक आहेत. या दोन्हींपैकी पैसा हरवला तर तो पुन्हा कमविता येतो परंतु वेळ हरवली तर ती पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यात जो वेळ पाळतो त्यालाच वेळ पाळते असे उद्गार ठाणे येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी व गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी संवत्सर येथील व्याख्यानातून व्यक्त केले.

गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २२ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित केल्या गेलेल्या व्याख्यानातून ‘ नवीन पिढी घडविताना..’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुणे येथील ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ अनिलराव गुंजाळ हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, वैजापूरचे आमदार रमेशराव बोरनारे, महानंदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रबापू जाधव, पाटबंधारे विभागाचे माजी उप अभियंता भास्करराव सुरळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राहुरी तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष ॲड. तान्हाजीराव धसाळ, प्रा. नारायणराव बारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.आजचे युग विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रवाहाचे युग आहे. नवीन पिढी आधुनिक साधनांचा वापर करून जगाशी जोडली जात असली तरी ज्ञान आणि कौशल्ये मिळविण्यासोबतच जीवनमूल्यांचे शिक्षण मिळणेही तितकेच आवश्यक असल्याचे सांगून प्रा. दवणे पुढे म्हणाले, नवीन पिढी घडविणे ही केवळ पालक किंवा शिक्षकांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. सुसंस्कारित, सुशिक्षित आणि संवेदनशील पिढी घडविण्यातूनच सक्षम, समृद्ध आणि प्रगत राष्ट्राची निर्मिती होऊ शकते. नवीन पिढी हीच उद्याच्या भारताची खरी शक्ती आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली अनेकदा नवीन पिढीमध्ये एकलकोंडेपणा, असंहिष्णुता आणि स्वकेंद्रित वृत्ती वाढताना दिसते. मोबाईल शंभर टक्के वाईट आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्याद्वारे काही चांगल्या गोष्टींचे ज्ञानही आपल्याला मिळविता येते. परंतु चांगले घेण्याची बहुतांशी तरुणांना सवयच राहिलेली नाही. त्यामुळे तरुण पिढी वैफल्यग्रस्ततेकडे चालल्याचे विदारक सत्य समोर दिसते आहे. अशा परिस्थितीत कुटुंब, शाळा आणि समाजाने पुढे येऊन तरुण पिढीला योग्य दिशा देणे गरजेचे आहे. मार्गदर्शन आणि संस्कारांमुळे मुलांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि मानवतेचा दृष्टिकोन विकसित होतो. चांगले संस्कार असलेली पिढी केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे तर समाज आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठीही योगदान देते असेही प्रा. प्रवीण दवणे यांनी सांगितले.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्व. नामदेवराव परजणे पाटील यांच्या आठवणींना व कार्याला उजाळा देताना दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पस्तीस – चाळीस वर्षापूर्वी राज्यात उभारलेल्या प्रचंड आंदोलनाचे नेतृत्व परजणे आण्णा यांनी केले होते. त्यावेळी दुधाला योग्य दर आणि दुग्ध व्यवसायासाठीच्या सोई – सुविधा शासनाकडून मिळवून घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. आण्णांनी दुग्ध व्यवसायाच्याही पलिकडे जाऊन सर्वसामान्य लोकांसाठी केलेले काम आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून आण्णांनी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेऊन वाटचाल करणे हीच त्यांना पुण्यस्माणानिमित्त खरी आदरांजली ठरेल असेही ना. विखे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.शिक्षणतज्ज्ञ अनिलराव गुंजाळ यांनीही आपल्या भाषणातून आजचा काळ वेगवान तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली आणि वाढती स्पर्धा यांचा आहे. अशा परिस्थितीत नवीन पिढी घडविण्याचे कार्य अत्यंत जबाबदारीचे आणि महत्त्वाचे ठरते. राष्ट्राचे भविष्य हे नव्या पिढीच्या हातात असते. त्यामुळे त्यांच्यावर योग्य संस्कार, मूल्ये आणि ज्ञानाची पेरणी करणे आवश्यक असल्याचे सांगून संवत्सर येथे अखंडपणे सुरु असलेली व्याख्यानमाला महाराष्ट्रातल्या व्याख्यानमालेतील सर्वात सुंदर व्याख्यानमाला असल्याचे सांगितले.ना. विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने तालुक्याच्या पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी सुमारे अकराशे वह्या ना. विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्या. पुण्यस्मरण सोहळ्यापूर्वी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या बालस्नेही बहुद्देशीय सभागृह व हॅन्डवॉश स्टेशन या उपक्रमांचे उद्घाटन केले. तसेच शाळेत राबविल्या गेलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी करुन कौतूक केले. राजेश परजणे पाटील यांनी व्यक्त केलेल्या आभार प्रदर्शनानंतर तीन दिवस सुरु असलेल्या व्याख्यानमालेचा समारोप झाला. सोहळ्यासाठी विविध स्तरातील मान्यवर, शासकीय अधिकारी, शिक्षक पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



