माहेगाव देशमुख येथून पायी दिंडीचे भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान

माहेगाव देशमुख येथून पायी दिंडीचे भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान


माजी आमदार अशोकराव काळे यांनी वारकऱ्यांना दिल्या शुभेच्छा
कोपरगांव। प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील श्री अमृतेश्वर भजनी मंडळ व समस्त माहेगाव देशमुख ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजित श्री क्षेत्र माहेगाव देशमुख (साकुरी) ते श्री क्षेत्र पंढरपूर या आषाढी पायी दिंडीचे शुक्रवार (दि.१०) रोजी मोठ्या भक्तिमय वातावरणात विठोबा-रुखुमाईच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून त्यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले व वारकऱ्यांना पंढरीच्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या.टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नाम घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी बोलताना माजी आमदार अशोकराव काळे म्हणाले, ‘आषाढी वारी ही केवळ पंढरपूरकडे जाणारी यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, भक्तीचा, समतेचा आणि सामाजिक ऐक्याचा महान उत्सव आहे. वारकरी संप्रदायाने अनेक शतकांपासून समाजाला प्रेम, बंधुभाव, संयम आणि सेवाभावाची शिकवण दिली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात वारीची परंपरा माणसाला अध्यात्माशी जोडण्याचे आणि समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे.माहेगाव देशमुख येथील श्री अमृतेश्वर भजनी मंडळ आणि ग्रामस्थांनी ही परंपरा जपण्यासाठी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहेत. सर्व वारकऱ्यांची वारी सुखरूप, मंगलमय आणि निर्विघ्न पार पडो, तसेच पांडुरंगाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान लाभो, व भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या.या प्रसंगी श्री अमृतेश्वर भजनी मंडळ, वारकरी तसेच माहेगाव देशमुख परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात विठोबा रखुमाई च्या जयघोषात पायी दिंडीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.



