कोपरगांव पोलिसांनी काढला रूटमार्च
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

कोपरगांव पोलिसांनी काढला रूटमार्च


सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
कोपरगाव । प्रतिनिधी । आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण शांततेत पार पडावेत आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी कोपरगाव शहर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यापासून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तहसील मैदान परिसर तसेच शहरातील विविध भागांतून पोलिसांचे संचलन करण्यात आले.आगामी ईद-ए-मिलाद, रक्षाबंधन आणि दहीहंडी उत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अफवा, गैरप्रकार अथवा अनुचित घटना घडू नयेत, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे.रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी आणि सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट झाले.



