विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प – आ.आशुतोष काळे
विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प – आ.आशुतोष काळे

कोपरगांव । प्रतिनिधी । अर्थखात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या आणि अर्थसंकल्प मांडतांना नेहमीच सर्वच घटकांना न्याय देण्याची परंपरा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राज्याच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतांना याहीवेळेस जपली असून विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील समस्त देशवासीयांसाठी प्रेरणादायी प्रसंग आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते त्याठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले असून त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती उपाययोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४२ टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे.आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रमशाळा, ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्तीमुक्त वसाहत योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे असे अनेक महत्वाचे निर्णय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतांना घेतले आहेत.कृषी, सिंचन, आरोग्य, क्रीडा, ग्रामविकास, नगरविकास, ऊर्जा, सांस्कृतिक, पर्यटन आदी सर्व विभागासाठी निधीची तरतूद असलेला विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.



