नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी
बाळासाहेब थोरात यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सविस्तर चर्चा, निवेदनही दिले

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी


बाळासाहेब थोरात यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सविस्तर चर्चा, निवेदनही दिले

या भेटीत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “हा मूळ मार्ग केवळ रेल्वे प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक आणि पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा कणा ठरणारा आहे. या मार्गामुळे उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.”
2020 मध्ये सुधारित डीपीआर, 2021 मध्ये मंत्रिमंडळाची मंजुरी
“मी महसूल मंत्री असताना या मूळ मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भूसंपादनही झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचलेला होता,” असे थोरात यांनी सांगितले.
GMRT चा आधार देत मार्ग बदलण्यावर नाराजी
अलीकडेच संसदेत दिलेल्या निवेदनात नाशिक–पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलल्याचे जाहीर करण्यात आले. GMRT चा आधार देत मूळ अलाइनमेंट बदलण्यात आल्याने या मार्गावरील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे थोरात यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले.
नागरिकांच्या भावना थेट मंत्र्यांपर्यंत
या भेटीदरम्यान बाळासाहेब थोरात यांनी मूळ मार्गावरील नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि विकासाच्या आशा रेल्वेमंत्र्यांपर्यंत सविस्तरपणे पोहोचवल्या. “हा मार्ग आत्ताच रेल्वेने जोडला गेला नाही, तर पुढील अनेक दशके या भागाला संधी मिळणार नाही. त्यामुळे ही लढाई केवळ एका नेत्याची नसून, संपूर्ण परिसराच्या भवितव्याची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे,” असे आवाहनही त्यांनी केले.



