अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर मध्ये सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादा पवार यांना आदरांजली

अजित दादांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात


संगमनेर मध्ये सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादा पवार यांना आदरांजली

मालपाणी लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेत स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करताना ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, मा. खा डॉ सुजय विखे, उद्योगपती राजेश मालपाणी, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, बाबा ओहोळ, राष्ट्रवादीचे दिलीपराव शिंदे ,आबासाहेब थोरात, कपिल पवार, देवराज थोरात ,पृथ्वीराज थोरात, पांडुरंग घुले ,बाळासाहेब गायकवाड, यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1992 पासून अजितदादा पवार व आपण एकत्रितपणे विधिमंडळ, मंत्रिमंडळ अशा विविध ठिकाणी काम केले. राज्यभरात अनेक सभा एकत्रित केल्या. त्यांचा स्वभाव हा रोखठोक होता. कटू निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. परंतु हा निर्णय राज्याच्या हिताचा असायचा. 93 पिंपळगाव माथा येथे पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी ते आले होते आणि त्यावेळी गावकऱ्यांनी घातलेले जेवण त्यांना आजही आठवायचे. थोरात कारखान्याने नवीन 5500 मे टन क्षमतेचा कारखाना सुरू केल्यानंतर सातत्याने या कारखान्याबाबत ते विचारणा करायचे. एक दिवस अचानक अजित दादा डायरेक्ट गेटवर आले आणि सुरक्षा रक्षकाला सांगून कारखान्याची पाहणी केली. त्यावेळेस मी मुंबईत होतो .या उपक्रमाची त्यांनी कौतुक केले आणि राज्यभर सुद्धा सांगितले चांगल्या कामाचे कौतुक करण हे त्यांचे वैशिष्ट्य होतं. सातत्याने जनतेमध्ये राहणारे रोखठोक अजितदादा आज आपल्यात नाही हे मनाला पटत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असल्याचे ते म्हणाले.

तर मा आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, अजितदादा हे सतत जनतेमध्ये राहणारे आणि लोकांचे काम करणारे होते नवीन राजकारणात येणाऱ्या युवकांनी त्यांच्या विकासाचा विचार घेऊन काम केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरणार आहेतर आ.सत्यजित तांबे म्हणाले की 2007 पासून आपण राजकीय जीवनाला सुरुवात केली या अनेक वर्षांच्या कार्यकाळात अजितदादांचा मोठा सहवास लाभला अगदी मुलाप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केले. ते नेहमी रोखठोक बोलायचे. काम होणार असेल तर हो म्हणायचे विनाकारण हेलपाटे त्यांनी कोणाला मारायला सांगितले नाही. संपूर्ण राज्य त्यांना दादा म्हणून ओळखायचे इतकेच काय तर पंतप्रधान सुद्धा त्यांना दादा म्हणायचे असा हा जनतेचा दादा आपल्यात नाही हे मोठे दुःख असल्याचे ते म्हणाले. डॉ सुजय विखे म्हणाले की, रोखठोक राजकारण हे अडचणीची ठरू शकते मात्र अजितदादांनी त्या रोखठोक राजकारणांमधून लोकप्रियता मिळवली. वेळेचे ते पक्के होते त्यांनी कधीही वेळ चुकवली नाही. राजकीय मतभेद असतात परंतु जनतेच्या विकासासाठी एकत्र यायचं हा त्यांचा मंत्र तरुण पिढीने जोपासला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी विविध पक्षांच्या वतीने विविध कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीपराव शिंदे यांनी केले तर कपिल पवार व आबासाहेब थोरात यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला संगमनेर मधील सर्व पक्षांचे नागरिक कार्यकर्ते युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



