महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील संशोधक विद्यार्थी डॉ. प्रणव पावसे यांना NABARD कडून राष्ट्रीय स्तरावरील सन्मान

महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथील संशोधक विद्यार्थी डॉ. प्रणव पावसे यांना NABARD कडून राष्ट्रीय स्तरावरील सन्मान

संगमनेर । प्रतिनिधी । डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पीएच.डी. संशोधन विद्यार्थी डॉ. प्रणव प्रमोद पावसे यांना नाबार्ड (NABARD) कडून उत्कृष्ट डॉक्टरेट प्रबंध – २०२३ या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

या प्रतिष्ठित पुरस्कारामध्ये ₹१ लाख रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन डॉ. पावसे यांचा गौरव करण्यात आला. हवामान-स्मार्ट शेती (Climate Smart Agriculture) या संशोधन क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत उत्पादन, संसाधन कार्यक्षमता आणि जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे. डॉ. पावसे यांनी आजपर्यंत १ पेटंट, १ कॉपीराइट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील २५ संशोधन लेख तसेच २ शैक्षणिक पुस्तके प्रकाशित केली असून, त्यांचे संशोधन कृषी अभियांत्रिकी व हवामान-स्मार्ट शेती क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत आहे. डॉ. प्रणव पावसे हे हिवरगाव पावसा, तालुका – संगमनेर येथील रहिवासी असून, त्यांच्या पीएच.डी. संशोधनाचे मार्गदर्शन डॉ. सचिन मधुकर नलावडे, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी केले.डॉ. प्रणव पवासे यांचे वडील डॉ. प्रमोद बबनराव पावसे, हे राजहंस दूध संघाचे विद्यमान संचालक आहेत.डॉ प्रणव पावशे यांच्या यशाबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा .चेअरमन राजेंद्र चकोर, पांडुरंग पाटील घुले, ॲड माधवराव कानवडे सौ दुर्गाताई तांबे, यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे मान्यवर, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, नातेवाईक व ग्रामस्थांनी डॉ. प्रणव पावसे यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या संशोधनामुळे भविष्यात कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



