मायेची सावली वात्सल्यमूर्ती – सौ.कांचनताई थोरात

मायेची सावली वात्सल्यमूर्ती – सौ.कांचनताई थोरात

संगमनेर । विनोद जवरे । महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छ व पारदर्शी कार्यकर्तृत्वाने लोकप्रिय असणारे राजहंस नेतृत्व म्हणजे माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात हे होय.

त्यांच्याकडे उभा महाराष्ट्र आज यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार म्हणून पाहतो आहे. थोरात साहेबांच्या सुविद्य पत्नी सौ.कांचनताई थोरात ह्या वेणूताईंचा मायेचा वारसा चालवत असून सर्व कार्यकर्त्यांसाठी वात्सल्यमूर्ती असलेल्या सौ.कांचनताई थोरात ह्या सर्वांसाठी मायेची सावली आहेत.संगमनेर मधील शिवाजीनगर येथील सुदर्शन निवासस्थानात तालुक्यातील जिल्ह्यातील व राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब, जन माणसांचा मान,सन्मान, चहा – पाणी आदरतिथ्य अविरतपणे आजही सुरू आहे. काँग्रेस नेते व राज्याचे मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे हे.निवासस्थान. या निवासस्थानी तालुक्यातील तमाम जनतेच्या प्रेमळ वहिनी म्हणजे आदरणीय सौ.कांचन ताई थोरात यांच्याकडून सर्वांना मिळणारा प्रेमाचा जिव्हाळा हा संगमनेरची समृद्ध परंपरा जपणारा आहे.

सांगली जिल्ह्यातील कृष्णाकाठचे तांबवे गाव ते प्रवरा काठचे जोर्वे गाव हा त्यांचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तांबवे चे पाटील आणि सौ.कांचन ताई थोरात यांचे वडील शहाजीराव पाटील यांच्या राबत्या घरात वाढलेल्या सौ.कांचन ताईंना समाजसेवेचे बाळकडू लहानपणीच घरातूनच मिळाले. विवाहानंतर थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व सौ.मथुराबाई थोरात हे त्यांना आई वडीलांप्रमाणेच मिळाले.जोर्वे येथील संत सावली म्हणजे भरलेले गोकुळ. यात सौ.कांचन ताई थोरात एकरूप झाल्या. आणि आलेल्या प्रत्येकाच्या व तहानलेल्या, भुकेलेल्याच्या मदतीला धावून जात त्यांनी थोरात घराण्याचा समृद्ध समाजसेवेचा वारसा अविरतपणे जोपासला. अत्यंत नम्र, साधा, सरळ व भोळा स्वभाव असलेल्या ताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्व तालुक्यात मोठा आदर होत आहे.पूर्णतः धार्मिक असलेल्या ताई या पुरोगामी विचारांचे आहेत. सर्व धर्म समभाव व समानता जोपासत त्यांनी महिला कार्यकर्त्यांचा मोठा संच उभा केला आहे. सौ.दुर्गाताई तांबे यांच्या साथीने अनेक महिला बचत गट कार्यरत केले आहेत. या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे मोठे काम होत आहे. संगमनेर हे शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असून येथील नवयुवक व मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत आहेत. या सर्व मुली व तरुणांना आदरणीय सौ.कांचन ताई थोरात यांची सदैव मोठी प्रेरणा राहिली आहे. आपल्या तालुक्यातील मुलींनी शिकावं मोठं व्हावं यासाठी त्यांनी सातत्याने धडपड केली आहे. लोकनेते थोरात साहेब व कार्यकर्त्यांना पाठबळ देणाऱ्या सौ.कांचन ताई थोरात कधीही प्रसिद्धीच्या झोतात येत नाहीत. राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जय हिंद महिला मंडळ, हिरकणी बचत गट, माऊली बहुउद्देशीय संस्था अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्या तालुक्यातील महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत. यामध्ये आरोग्य शिबिरे, हिमोग्लोबिन तपासणी, बचत गट, व्यवसाय मार्गदर्शन, वाचन ग्रुप,सांस्कृतिक कार्यक्रम असे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. दंडकारण्य अभियान त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. तर नवरात्र उत्सवानिमित्त होणारा संस्कृतीक कार्यक्रम हा तर संगमनेरचे वैशिष्ट्य ठरू लागला आहे. या कार्यक्रमात सौ.कांचनताई यांनी हिरीरीने भाग घेत कृष्णजन्माच्या कथेत बाळकृष्णाची आई यशोदा यांची भूमिका सादर करून सर्वांना भावनिक केले. अशा प्रेमळ सौ.कांचन ताईंना अत्यंत प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय यशवंत वेणू पुरस्काराने पुणे येथे गौरवले गेले. तर जाणीव या पुरस्काराने गोदातीरी नाशिक येथे गौरवण्यात आले. खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाण आणि वेणूताई चव्हाण यांचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात व सौ. कांचन ताई थोरात आज राज्यात चालवत आहेत. तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने सर्वांसाठी मायेची सावली असणाऱ्या आदरणीय सौ.कांचन ताई थोरात यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा !



