अमृतवाहिनी बँकेकडून 1200 कोटींच्या व्यवसायाची वाटचाल कौतुकास्पद – मा.मंत्री थोरात

अमृतवाहिनी बँकेकडून 1200 कोटींच्या व्यवसायाची वाटचाल कौतुकास्पद – मा.मंत्री थोरात

बँकेला 11.17 कोटींचा ढोबळ नफा, तर 0 टक्के एनपीए – सुधाकर जोशी
संगमनेर । प्रतिनिधी ।बँकिंग व्यवसाय हा अत्यंत काळजीचा विषय आहे. बँकिंग मध्ये ग्राहक आणि नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे असते. अमृतवाहिनी सहकारी बँकेने आपल्या चांगल्या कामातून हा विश्वास सार्थ ठरवला आहे. सर्व आधुनिक प्रणालींचा वापर करून ग्राहकांना चांगल्या सुविधा देत बँकेने 1200 कोटींचा केलेल्या व्यवसाय हा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या बिझनेस समिट 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, व्हाईस चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे, बाबासाहेब ओहोळ, रामहरी कातोरे,अजय फटांगरे,शरद नाना थोरात, बापूसा टाक, संचालक अविनाश सोनवणे, अण्णासाहेब शिंदे, ॲड.लक्ष्मण खेमनर, बाळासाहेब वाळके, बापूसाहेब गिरी, श्रीमती ललिता दिघे, विवेक तांबे, राजू गुंजाळ, ॲड शिवाजीराव दिघे, सौ सुलभाताई दिघे, विष्णुपंत रहाटळ, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक रमेश पवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याचबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या 10 अधिकाऱ्यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतवाहिनी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी,कर्मचारी या सर्वांनी एकत्रितपणे चांगले काम केल्याने बँकेचे हे यश आहे. बँकेमध्ये 706 कोटींच्या ठेवी असून बँकेने एकूण 1200 कोटींचा केलेला व्यवसाय हा अत्यंत कौतुकास्पद आहे. बँकिंग मध्ये कर्ज वितरण ही अवघड बाब आहे. याचबरोबर कर्ज वसुली होणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.या दोन्ही बाबी अमृतवाहिनी बँकेने अत्यंत चांगल्या केल्या आहेत.संगमनेर तालुक्यातील बँकांमधून सुमारे 10 हजार कोटींच्या ठेवी असून हे चांगले अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. या ठेवींमधून अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. बिनचूक काम होण्याकरता आयएसओ प्रणालीसह बँकेने डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. नवीन एआय तंत्रज्ञान आले असून जे जे नवीन आहे ते बँकेने स्वीकारले आहे. अनेक ठिकाणी बँका आणि पतसंस्था कोसळल्या आहेत. चुकीचे काही घडणे हे चांगले नाही. बँकिंग मध्ये विश्वास ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि तो विश्वास सार्थ करणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते. अमृतवाहिनी बँकेने कायम चांगल्या गुणवत्तेबरोबर ग्राहकांचा विश्वास जपला आहे. दूध व्यवसाय वाढीसाठी चांगली योजना सुरू केली असून यामधून शेतकऱ्यांना मदत झाली असल्याचे ते म्हणाले.तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक ठरला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी बँकिंग मध्ये मोठे काम केले असून अनेक वर्षे ते जिल्हा बँकेचे चेअरमन व संचालक होते. याचबरोबर राज्य सहकारी बँकेचे चेअरमन पद ही त्यांनी भूषवले. आर्थिक शिस्त,प्रामाणिकपणा याला प्राधान्य दिले. सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून सहकाराला प्रथम प्राधान्य प्रत्येकाने दिले पाहिजे. बँकिंग व्यवसायाला दरवर्षी ऑडिट असून बँकेची वाटचाल ही अत्यंत उत्कृष्ट असल्याचे ते म्हणाले.
तर चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी बँकेने 1200 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार केला असून यावर्षी 22.2 टक्के गतीने वाढ झाली आहे. ढोबळ नफा 11 कोटी 17 लाख रुपये असून निवड नफा 8 कोटी 1 लाख रुपये आहे. तर नेट एनपीए 0 टक्के आहे. बँकेच्या 11 शाखा कार्यरत असून ट्रेझरी मधून 52 लाख रुपयांचा नफा बँकेला मिळाला आहे. ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्म मधून दररोज किमान दीड ते दोन कोटींचे व्यवहार होत असून 1 वर्षात 500 कोटींचा डिजिटल ट्रांजेक्शन होत असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या वर्षांमध्ये 5 शाखा नवीन शाखा सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी बी.आर.चकोर, नवनाथ महाराज आंधळे, ॲड.अशोक हजारे, ॲड.आर.बी.सोनवणे, प्रभाकर कांदळकर, सतीश वर्पे, राणी प्रसाद मुंदडा, डॉ.संतोष खेडलेकर, दशरथ वर्पे, राधाकिसन रहाणे यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संचालिका ललिता दिघे, निवृत्त शाखा अधिकारी रमेश पवार, अमित नारायणे, रायभान पवार, मुख्याधिकारी सुशील गुजराथी यांनीही मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक व्हा. चेअरमन ॲड.नानासाहेब शिंदे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर बापूसाहेब गिरी यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी सभासद अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




