‘इस्रो’नंतर ‘नासा’चे स्वप्न; शिक्षकांच्या संशोधनाला निधी, अहिल्यानगरला शिक्षणात नंबर वन करण्याचा विखे पाटलांचा निर्धार

‘इस्रो’नंतर ‘नासा’चे स्वप्न; शिक्षकांच्या संशोधनाला निधी, अहिल्यानगरला शिक्षणात नंबर वन करण्याचा विखे पाटलांचा निर्धार


‘इस्रो’नंतर ‘नासा’चे स्वप्न; शिक्षकांच्या संशोधनाला निधी, अहिल्यानगरला शिक्षणात नंबर वन करण्याचा विखे पाटलांचा निर्धार
लोणी । प्रतिनिधी । प्राथमिक शिक्षणात गुंतवणूक वाढवून शैक्षणिकदृष्ट्या जिल्हा अधिक समृद्ध करण्याचा आपला प्रयत्न असून, विद्यार्थ्यांबरोबरच पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शैक्षणिक संशोधनासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता करून देण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या वतीने देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्ताने प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास आ. किशोर दराडे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, नगराध्यक्ष सौ.जयश्री थोरात, डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे, अण्णासाहेब कडू, मकरंद गुणे, विजय लगड, प्रकल्प संचालक मंजूषा देवकर, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेने शिक्षणामध्ये साध्य केलेल्या गुणवत्तेमुळेच राज्यात आपला जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालयामधील प्रवेश यामध्ये सुद्धा शिक्षकांच्या योगदानामुळे मोठी उपलब्धी साध्य झाली आहे. शिक्षकांच्या या समर्पित भावनेचे कौतुक असल्याचे नमूद करून, जिल्हा परिषदेच्या शाळा ही ज्ञानमंदिरे आहेत, त्याचे पावित्र्य राखणे ही आपली जबाबदारी असून, काळानुरूप शिक्षण क्षेत्रात झालेले बदल स्वीकारून पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी मागील वर्षापासून १ कोटी रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. यासाठी आणखीही निधी देण्याची आपली तयारी आहे. जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता ‘इस्रो’पर्यंत गेले आहेत, त्यांना ‘नासा’पर्यंत कसे पाठविता येईल याचेही प्रयत्न शिक्षकांनी केले पाहिजेत. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनाही शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनासाठी प्रोत्साहन देण्याची आपली तयारी असून, यासाठीचा सर्व खर्च जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणातील गुंतवणूक वाढवून जिल्ह्याचे शैक्षणिक क्षेत्र अधिक समृद्ध करणे हेच आपले उद्दिष्ट असून, शिक्षण क्षेत्रात राज्यात आपण प्रथम स्थानावर कसे राहू, यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे.कोव्हिड नंतर ऑनलाइन शिक्षणाची सुविधा आपल्याला मिळाली, परंतु त्याचे बरे-वाईट परिणामही आपल्याला भोगावे लागत आहेत. हे दुष्परिणाम रोखायचे असतील तर समाज माध्यमांमधील सकारात्मक गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत न्याव्या लागतील. मात्र शाळेमध्ये शिक्षकांनी मोबाईल वापरण्यावर निर्बंध आणले पाहिजेत, असे मत व्यक्त करुन, तंत्रज्ञान आपण बदलू शकत नाही परंतु भविष्याचा विचार करून, या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव उपक्रमांसाठी कसा करून घेता येईल याचा विचार करा, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद डिजिटल शिक्षणाच्या बाबतीतही मागे राहून चालणार नाही. इंटरअॅक्टिव्ह बोर्ड बहुतांशी शाळांना उपलब्ध करून दिले आहेत, उर्वरित शाळांनाही लवकरच त्याची उपलब्धता होईल.अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक शाळेला शौचालयाची उपलब्धता करून देण्यासाठी यावर्षी ९ कोटी रुपयांची उपलब्धता करून दिली. पुढील वर्षापर्यंत शंभर टक्के शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी निधी देणार असून, शौचालयांच्या स्वच्छतेसाठी एका विश्वस्त मंडळाबरोबर आपली प्राथमिक चर्चा झाली आहे. शौचालयांच्या स्वच्छतेबाबतही जागरूक राहिले पाहिजे, यासाठी मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकांची समिती तयार करण्याची सूचना मंत्री विखे पाटील यांनी आपल्या भाषणात केली.याप्रसंगी आ. नरेंद्र दराडे यांनीही शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न उपस्थित करून, याबाबत मंत्री विखे पाटील यांनी निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती आपल्या भाषणात केली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी यांनी जिल्हा परिषद शाळांनी केलेल्या प्रगतीचा आढावा आपल्या भाषणात घेतला. पुरस्कारप्राप्त शिक्षिका सुमनताई खतोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



