पाऊस लांबला तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये; आवर्तनाचे नियोजन करून पाणी निश्चित देणार – ना. विखे पाटील

पाऊस लांबला तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये; आवर्तनाचे नियोजन करून पाणी निश्चित देणार – ना. विखे पाटील


पाऊस लांबला तरी शेतकऱ्यांनी चिंता करू नये; आवर्तनाचे नियोजन करून पाणी निश्चित देणार – ना. विखे पाटील
लोणी । प्रतिनिधी । धरणे भरलेली असली तरी पाऊस लांबल्याने प्रवरा आणि गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून, आवर्तनाचे योग्य वेळापत्रक जलसंपदा विभाग तयार करेल; त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, शेतकऱ्यांना पाणी निश्चित मिळेल. मात्र, भविष्यातील धोके ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

प्रवरा आणि गोदावरी लाभक्षेत्रातील पाणी समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची समन्वय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने प्रवरा आणि गोदावरी धरण समूहातील पाण्याची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, आ. अमोल खताळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, डॉ. भास्करराव खर्डे, शिवाजीराव जोंधळे, कैलास तांबे, आबासाहेब थोरात, गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, बापूसाहेब देशमुख, जलसंपदा विभागाचे अभियंता गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे, स्वप्नील काळे, सायली पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये उपस्थित शेतकऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत मांडलेल्या सूचनांचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री विखे पाटील म्हणाले की, भंडारदरा, निळवंडे, गोदावरी धरणांची परिस्थिती फार काही वेगळी नाही. गोदावरीतून अद्यापही ओव्हरफ्लोचे पाणी सुरू असल्यामुळे चार्या सुरू आहेत; परंतु विजेच्या प्रश्नामुळे पाणी मिळू शकत नाही, याची योग्य सांगड घालावी लागेल. उपलब्ध पाण्यावर भंडारदरा, निळवंडे आणि गोदावरीतून आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

याच दरम्यान नदीपात्रातून होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांनाच खडे बोल सुनावले. यापूर्वीही नदीपात्रातील वाळू उपसा रोखण्याबाबत सूचना दिल्या होत्या, परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. वाळू उपसा करण्यासाठी जलसंपदा विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक असतानाही त्याची कार्यवाही अधिकाऱ्यांकडून होत नाही. परंतु, आता तातडीने वाळू उपसा रोखण्यासाठी नियमांचा आधार घेऊन कडक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.आ. अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, यापूर्वी आवर्तनाचे नियोजन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने झाले होते. यंदा मात्र पाणी असूनही शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे, परंतु यावरही जलसंपदा विभाग मात करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भोजापूर पूरचारीचा समावेश नदीजोड प्रकल्पात केल्याबद्दल तसेच साकूर उपसा सिंचन योजनेला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी मंत्री विखे पाटील यांचे आभार मानले. शेतकऱ्यांची मागणी तसेच आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन आवर्तन सोडण्याची मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाकचौरे व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचीही भाषणे झाली.
“उपस्थित शेतकऱ्यांनी विजेच्या गंभीर प्रश्नाकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले. वीज प्रश्नाच्या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची याच आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन भारनियमनाच्या वाढत्या प्रमाणाबाबत माहिती जाणून घेण्यात येईल. जिल्ह्यातील भारनियमनाच्या समस्येमधून शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल, यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.”



