जयहिंदच्या महोत्सवामुळे कलाक्षेत्रातील करिअरच्या संधी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

जयहिंदच्या महोत्सवामुळे कलाक्षेत्रातील करिअरच्या संधी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात


जयहिंदच्या कला महोत्सवात 12000 विद्यार्थ्यांचा सहभाग
संगमनेर । प्रतिनिधी । शिक्षणाबरोबर प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंदच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असते. संगमनेर मध्ये झालेल्या दोन दिवसीय शिबिरात सुमारे बारा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग हा कौतुकास्पद आहे .अशा शिबिरांमधून विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी मोठी संधी निर्माण होत असून हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळच्या वतीने दोन दिवसीय कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर डॉ नामदेव गुंजाळ , समन्वयक प्रकाश पारखे, मुख्याध्यापक चांगदेव खेमनर, संजय मासाळ विकास भालेराव ,कला संघटनेचे अध्यक्ष संतोष गोरे, राजू गोरे, विनोद राऊत, हस्ताक्षर आर्टिस्ट सिसोदे, दत्ता बटवाल ,संजय सोनवणे, बजरंग जेडगुले ,साहेबराव गुंजाळ, सुनील कवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या दोन दिवशी या स्पर्धेमध्ये रंगभरण स्पर्धेत तालुक्यातील 4500 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर पर्यावरण पूरक गणपती निर्मितीमध्ये 830 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .दोन दिवसांमध्ये कला महोत्सवातून एकूण 12000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये मातीकाम, पेंटिंग, वॉटर कलर ,संगीत ,गायन, नृत्य, झुम्बा डान्स ,थ्रीडी पेंटिंग ,कला बाहुली काम ,कॅलिग्राफी ,ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण असे विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण घेण्यात आले.यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून निरोगी समाज निर्मिती बरोबर भावी पिढी समृद्ध घडवण्यासाठी अत्यंत चांगले काम होत आहे. जयहिंदच्या या कला महोत्सवात विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभ्यास धोरण 2020 नुसार कौशल्य विकास वाढ व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला आहे. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक कला गुण असतात त्यांना योग्य संधी मिळाली तर ते नक्की यशस्वी होतात या सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याचे काम आपण सातत्याने संगमनेर मध्ये करत आहोत.

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित हा उपक्रम खरंतर राज्यासाठी दिशादर्शक आहे. यामधून भविष्यातील अनेक विविध क्षेत्रातील यशस्वी तरुण दडलेले आहेत. कला क्षेत्रातील कौशल्यांमधून भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणालेतर माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले, परिपूर्ण विद्यार्थ्यांबरोबर एक समृद्ध आणि सुजाण नागरिक घडवण्यासाठी जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून सातत्याने काम केले जात आहे. अनेक कला कौशल्य विद्यार्थ्यांना या दोन दिवसाच्या शिबिरामधून शिकवण्यात आले आहे. या कला कौशल्यांचा उपयोग नक्कीच त्यांच्या भावी जीवनामध्ये होणार आहे. छोट्या छोट्या कौशल्यांमधून मोठे कलाकार निर्माण होऊ शकतात. त्याचे प्रशिक्षण या दोन दिवसाच्या शिबिरांमधून तर त्यांना मिळाले असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ नामदेव गुंजाळ यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश पारखे यांनी केले तर चांगदेव खेमनर यांनी आभार मानले. यावेळी शहरातील नागरिक कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



