ग्रीन फील्ड महामार्ग शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा थेट नितीन गडकरींना फोन
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट



सर्वपक्षीय शिष्टमंडळाने घेतली मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे तळेगाव भागातील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली .यावेळी माजी उपसभापती अविनाश सोनवणे, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, हौशीराम सोनवणे, डॉ संदीप गोर्डे, किसनराव सुपेकर, विलास मास्तर सोनवणे, शिवनाथ गोरडे ,संपत गोर्डे,रावजी गोर्डे, विलास गोर्डे, रवींद्र गोर्डे, प्रकाश सुपेकर ,दत्तात्रय गोर्डे, मेजर बाळासाहेब गोर्डे ,सचिन गोरडे, बाळासाहेब कोते यांच्यासह विविध शेतकरी बांधव उपस्थित होते.सुरज चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग हा अहिल्यानगर जिल्ह्यातून जात असून जिल्ह्यात या महामार्गासाठी 1083.88 हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव, तळेगाव, अजमपुर, आरामपूर, वरझडी बुद्रुक , वरझडी खुर्द, हसनाबाद ,जुने गाव ,लोहारे ,कासारे, सादतपूर, चिंचपूर या गावांमधील मोठ्या प्रमाणात शेतजमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. 2021 22 मध्ये भूसंपादनाचा आराखडा मंजूर झाला होतायानुसार जमिनीसाठी अत्यंत कमी भाव दिला आहे. एकरी सात ते दहा लाख इतका भाव दिल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा डाळिंब भाजीपाला असे नगदी पिके या शेतीमध्ये असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून निळवंडे धरणाचे पाणी आल्याने शेतकऱ्यांनी बागायत केले आहे. पाटाच्या कडेला आणि सर्व तळेगाव भागामध्ये जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून संपादित केलेल्या जमिनीला खूप कमी भाव दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून या बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला भाव मिळावा व शासनाने संपादित केलेल्या जमिनीचे फेरमूल्यांकन व्हावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी अत्यंत योग्य आहे. यूपीए सरकारच्या काळात शासकीय कामांसाठी किंवा रस्त्यांसाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींना चांगला भाव मिळावा यासाठी श्रीमती सोनिया गांधी यांनी सातत्याने पुढाकार घेतला. आणि त्यानुसार विविध भागांमध्ये संपादित केलेल्या जमिनीला काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांना जमिनीचे चांगले भाव दिले. संगमनेर तालुक्यातही नाशिक पुणे महामार्गासाठी शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळाला. शेतकरी स्वतःची जमीन देतो आहे. त्यामुळे त्याला रास्त भाव मिळाला पाहिजे ही मागणी योग्य आहे आणि आपण या करता सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले.तर यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तात्काळ फोन लावला. फोनवरील संवादात त्यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची व्यथा मांडत या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा अशी मागणी केली .यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांच्या या मागणीबाबत याबाबत नक्कीच सकारात्मक प्रतिसाद दिला.
लोकनेते बाळासाहेब थोरात कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. विकास कामे करताना शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळावा याकरता त्यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून दिला आहे. काकडी विमानतळ, समृद्धी महामार्ग, नाशिक पुणे महामार्ग यामधील शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे . लोकनेते बाळासाहेब थोरात व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राजकारण विरहित स्नेहाचे संबंध आहेत. जनतेसाठी काम करणारे हे नेते असून आम्हा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून न्याय मिळेल हा विश्वास आहे
हौशीराम सोनवणे
प्रकल्प बाधित शेतकरी



