विकासाची प्रक्रीया राबविताना संस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांनाही महत्व दिले पाहीजे – ना.राधाकृष्ण विखे पाटील
विकासाची प्रक्रीया राबविताना संस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांनाही महत्व दिले पाहीजे – ना.राधाकृष्ण विखे पाटील

विकासाची प्रक्रीया राबविताना संस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांनाही महत्व दिले पाहीजे – ना.राधाकृष्ण विखे पाटील
श्रीरामपूर । प्रतिनिधी । जिल्ह्यातील तिर्थस्थानांचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. विकासाची प्रक्रीया राबविताना संस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांनाही महत्व दिले पाहीजे. तिर्थस्थानांच्या ठिकाणी विकासातून रोजगाराची निर्मिती करण्याचाही प्रयत्न आहे. अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे श्री.हरिहर केशव गोविंद संस्थानच्या सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जेष्ठ नागरीक फकीरनाना यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या याकार्यक्रमास ह.भ.प पीर महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुका अध्यक्ष बाबासाहेब चेडे, दिपक पटारे, सोपानराव शिरसाठी, जेष्ठ कार्यकर्ते इंद्रभान थोरात शहर अध्यक्ष जितेंद्र छाजेंड, बेलापूरच्या सरपंच सौ.प्रणाली भगत, उपसरपंच दिपक बारहाते, उपसभापती अभिषेक खंडागळे, संस्थानचे अध्यक्ष सतिष भगत आदि याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, या देवस्थानाची महती खुप मोठी आहे. लाभलेला पुरातन वारसा जतन करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य ठरते. विकासाची प्रक्रीया राबविताना परंपरा आणि वारसांनाही तेवढेच महत्व दिले पाहीजे कारण प्रत्येक देवस्थान हे सनातन हिंदु संस्कृतीचे प्रतिकं आहेत. या अध्यात्मिक स्थळांचा विकास करताना निधीची कमतरता भासु दिली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्याची अध्यात्मिक ओळख खुप मोठी आहे. संत चांगदेवांच्या समाधी पासून ते भगवान बाबांच्या गडापर्यंत प्रत्येक तालुक्यात मोठे देवस्थान आहे, ही त्या तालुक्याची ओळख ठरते त्यामुळेच या तिर्थस्थानांच्या विकासाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून, या भागाचा विकास झाला तर, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जिल्ह्यामध्ये अध्यात्मिक पर्यटन, औद्योगिक विकास आणि साहसी पर्यटनासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले असून, येणा-या पर्यटकांना चांगल्या संधी निर्माण व्हाव्यात असा विशेष प्रयत्न आमचा आहे. केशव गोविंद बन तिर्थस्थानाच्या विकासासाठी भविष्यातही निधी कमी पडू दिला जाणार नाही. प्रवरा नदीकाठी असलेल्या घाटाचे बांधकाम करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री विखे पाटील यांनी हजरत सैय्यद शाह बाबा यांच्या १८९ व्या उरुसाच्या निमित्ताने दर्ग्यावर जावून दर्शन घेतले. गेली अनेक वर्षांची परंपरा असलेले हे ठिकाण हिंदु मुस्लिम एैक्याचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले. बेलापूर येथील तलाठी कार्यालयाचे उद्घाटनही मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महसूल मंत्री असताना तालुक्यात तीस तलाठी कार्यालय आपण मंजुर केले होते. तलाठी कार्यालयांच्या माध्यमातून चांगली सुविधा लोकांना द्या, माहीती तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, शासकीय सेवा अधिक जलद गतीने देण्यासाठीही प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.



