आत्मनिर्भर भारताकडे अहिल्यानगरची मोठी झेप; वर्षात उभा राहिला ५ लाख तोफगोळे बनवणा-या प्रकल्पाचे आज लोकार्पण

आत्मनिर्भर भारताकडे अहिल्यानगरची मोठी झेप; वर्षात उभा राहिला ५ लाख तोफगोळे बनवणा-या प्रकल्पाचे आज लोकार्पण


आत्मनिर्भर भारताकडे अहिल्यानगरची मोठी झेप; वर्षात उभा राहिला ५ लाख तोफगोळे बनवणा-या प्रकल्पाचे आज लोकार्पण
शिर्डी । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यात पहिल्यांदाच विकसित होत असलेल्या ‘ग्लोब फोर्ज प्रा. लि.’ कंपनीच्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा ऐतिहासिक शुभारंभ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. ‘आत्मनिर्भर भारताचे’ स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहिल्यानगरची भूमिका आता महत्त्वपूर्ण मानली जात असून, श्रद्धेच्या भूमीतून भारताच्या संरक्षण सामर्थ्याचा उदय या प्रकल्पामुळे होत आहे.

सावळीविहीर येथील औद्योगिक वसाहतीत तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी औद्योगिक वसाहतीकरिता ५०० एकर जागा उपलब्ध करून दिली होती. या जागेवर आता संरक्षण उत्पादनाचा प्रकल्प उभा राहत आहे. उद्योजक गणेश निबे यांच्या ‘ग्लोब फोर्ज प्रा. लि.’ कंपनीने यासाठी पुढाकार घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने हा प्रकल्प अवघ्या एक वर्षामध्ये कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामध्ये १५५ मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचे उत्पादन करण्यात येणार असून, प्रतिवर्षी ५ लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे.प्रकल्पाचा लोकार्पण समारंभ ऐतिहासिक होण्याच्या दृष्टीने सावळीविहीर येथे जय्यत तयारी करण्यात आली असून, येथील औद्योगिक वसाहतीचे स्वरूपही आता बदलून गेले आहे. संरक्षणविषयक उत्पादनाचा प्रकल्प असल्यामुळे प्रवेशद्वारावर भव्य ऐतिहासिक कमान उभारण्यात आली आहे. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतमाता, हेलिकॉप्टर, विमान यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून, प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत.

कार्यक्रमाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या व्यासपीठावरही किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली असून, हे व्यासपीठही इतिहासकालीन संस्कृती आणि परंपरेने सजविले गेले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांचे व्यासपीठावर दुपारी ४ वाजता आगमन होणार आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने संरक्षण प्रणालीशी संबंधित सूक्ष्म व लघु उद्योगांशी निगडित उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, शंभरहून अधिक कंपन्या यामध्ये समाविष्ट आहेत. याबरोबरीनेच रॉकेट, ड्रोन आणि क्षेपणास्त्रे तसेच संरक्षण सज्जतेत यशस्वी कामगिरी करणाऱ्या साहित्याचे हे प्रदर्शन दिनांक २३ आणि २४ मे २०२६ दरम्यान या प्रकल्प स्थळावर विनामूल्य आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिक, महिला आणि विज्ञानप्रेमींसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.



