ग्रामीण भागातील लोड शेडिंग बंद करण्याची हरिश्चंद्र फेडरेशनची मागणी

ग्रामीण भागातील लोड शेडिंग बंद करण्याची हरिश्चंद्र फेडरेशनची मागणी

ग्रामीण भागातील लोड शेडिंग बंद करण्याची हरिश्चंद्र फेडरेशनची मागणी
संगमनेर तालुका व ग्रामीण भागामध्ये विजेचा खेळ खंडोबा झाला असून अनेक भागात व शहरात सातत्याने लोड शेडिंग मुळे लाईट बंद केली जाते. यामुळे शेतकरी विद्यार्थी नागरिक महिला त्रस्त असून ही लोडशेडिंग बंद करावी अशी वेळोवेळी मागणी केली आहे.लोड शेडिंग व विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे संगमनेर तालुका त्रस्त झाला आहे. राजकीय उद्देश ठेवून तालुक्यातील लाईट बंद करण्याचा डाव केला जातो की काय अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त झाल्याने अनेक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे व 11 तास लाईट मिळावी ही आग्रही मागणी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वेळोवेळी केली आहे. याचबरोबर डॉ जयश्रीताई थोरात यांच्या युवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संगमनेर वीज वितरण विभागाकडे ही आग्रही मागणी केली आहे याबाबत संगमनेर मधील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने 19 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर व वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता यांची समक्ष भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी मा. जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता यांनी नागरिकांच्या मागणीचा विचार करून सकारात्मक विचार करू असे सांगितले होते. त्यानंतर हरिश्चंद्र पाणीपुरवठा फेडरेशनच्या वतीने 10 जून 2026 रोजी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय व वीज वितरण विभाग यांना पत्र देण्यात आले.मात्र अद्यापही ग्रामीण भागात व शहरांमध्ये लोड शेडिंग मुळे लाईट बंद होते याचबरोबर रात्री सहा ते नऊ या वेळेमध्ये अनेकदा लाईट जाते. या काळामध्ये अनेकदा प्रवास होत असून ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शेतकरी घराकडे येत असताना बिबट्यांची हल्ले होत आहेत. महिला सुरक्षितता, मुलांचा अभ्यास या सर्व बाबी विचार करता यापुढील काळामध्ये ग्रामीण भाग व शहरांमध्ये सायंकाळी सहा ते सकाळी सहा या काळात लोड शेडिंग न करता पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा अशी आग्रही मागणी हरिश्चंद्र सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे फेडरेशनचे चेअरमन राजेंद्र गुंजाळ यांनी केली आहे.



