ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सर्व जागांवर आ.थोरात गटाचे उमेदवार विजयी
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत आ. थोरात गटाचे निर्विवाद वर्चस्व
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सर्व जागांवर आ.थोरात गटाचे उमेदवार विजयी
संगमनेर । प्रतिनिधी ।
विस्ताराने सर्वात मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायती कार्यरत असून काही ग्रामपंचायतीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व जागांवर आमदार थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळवला असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींवर आमदार थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे
संगमनेर तालुक्यातील शिबलापुर, पिंपळगाव देपा, पोखरी हवेली नांदुरी दुमाला या गावांमधील पाच जागांकरता पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये आश्वी गटातील शिबलापूर ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत आमदार थोरात गटाच्या सौ.गितांजली संदीप मुन्तोडे व करुणा सागर मुन्तोडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर पिंपळगाव देवा मधून नाना बाळशीराम गांजवे, पोखरी हवेली मधून घुले संचिता दिनकर व नांदुरी दुमाला येथून वैशाली अमोल कराळे ह्या विजयी झाले आहेत. हे सर्व उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात गटाचे आहेत.या सर्व उमेदवारांचे यशोधन जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व युवा नेत्या कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी मिलिंद कानवडे, किरण मिंडे, मारुती कवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की ,संगमनेर तालुका हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून कार्यकर्त्यांची मोठी फळी आपल्या तालुक्यात आहे. निवडणूक ही लोकशाही मधील प्रक्रिया असून निवडणुकीनंतर सर्वांनी आपसातील मतभेद दूर करून गावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
तर तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे म्हणाले की ,संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत या आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून आमदार थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. कार्यकर्त्यांचे मोठे जाळे ही तालुक्याची ताकद असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये सर्वांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन केले.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात जिंदाबाद च्या घोषणा देवून परिसर दुमदुमून दिला. गुलाल आणि फटाक्यांच्या आतिषबाजी करत सर्व उमेदवारांनी आपला विजय साजरा केला