गोदामातेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासना बरोबरच सेवाभावी संस्थांनीही दायित्व स्विकारावे – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

गोदामातेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासना बरोबरच सेवाभावी संस्थांनीही दायित्व स्विकारावे – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी ।
शासन, संघटना आणि समाज यांच्या समन्वयातून गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या उपक्रमास गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, अगामी काळात होणारा नाशिकचा महाकुंभ मेळा प्रदूषण मुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी आत्तापासूनच कटीबध्द व्हावे लागेल. गोदामातेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासना बरोबरच सेवाभावी संस्थांनीही दायित्व स्विकारावे असे आवाहन जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. रामतिर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोदावरी संवर्धन परिषदेचे उद्घाटन मंत्री विखे पाटील योच्या हस्ते झाले. गोदावरी नदी प्रदूषण मुक्ततेच्या संदर्भात शासनाची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.रमेश पांडव, सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकूंद खोचे, आर्ट ऑफ लिव्हींगचे राष्ट्रीय निमंत्रक चिराग पाटील, जलतज्ज्ञ डॉ.विप्लव पटनायक, डॉ.सुनिल कुटे, डॉ.प्राजक्ता बस्ते यांच्यासह जलसंपदा विभागाचे आधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना ना.विखे पाटील म्हणाले की, गोदावरी नदीचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. यामध्ये नागरीकांचा सहभाग तर खुप महत्वाचा असला पाहीजे. केवळ शासनच सर्व करेल यावर अवलंबुन न राहाता शासनाच्या बरोबरीने सेवाभावी संस्था आणि समाज यांच्या एकजुटीने गोदावरी प्रदूषण मुक्ततेची चळवळ यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोदावरीच्या लाभक्षेत्रात वाढणारे शहरीकरण आणि या शहरांचे प्रदूषीत पाणी गोदावरी नदीमध्ये सोडण्याचे वाढते प्रमाण हे सामाजिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खुप घातक आहे. स्थानिक संस्थानी एसटीपी प्लॅन्ट उभारले असले तरी, त्यांच्या क्षमतांची मर्यादाही आता तपासण्याची गरज असून, संस्थानी सुध्दा आता याबाबत गांभिर्याने विचार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी नदीजोड प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली आहे. गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करतानाच ते प्रदूषणमुक्तही असावे हा प्रयत्न करावा लागणार आहे. त्याचे आव्हान आपल्या सर्वांना स्विकारावे लागेल असे सुचित करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, या प्रदूषण मुक्त चळवळीसाठी सेवाभावी संस्थानी पुढाकार घेवून काही सुचना शासनास केल्यास त्यांचे स्वागतच होईल. शासन, सेवाभावी संस्था आणि यासाठी अभ्यास करणा-या तज्ज्ञांची समिती गठीत करण्याची तयारी ही आमच्या विभागाची असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. सद्य परिस्थितीत ग्लोबल वॉर्मींगचे प्रमाण वाढत आहे. पावसाचे ऋतूमानही बदलत चालले आहे. पावसाचे कमी अधिक प्रमाण हे लाभक्षेत्रावर परिणाम करणारे ठरत आहेत. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे संवर्धन करणे ही जबाबदारी आता सर्वांचीच झाली आहे. गोदावरी पात्रामध्ये पाणवेलींचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरु झाले असून, अगामी काळात नाशिक येथे संपन्न होणा-या महाकुंभ मेळ्याच्या तयारीचा भाग म्हणूनच गोदावरी नदी प्रदूषण मुक्ततेचा संकल्प पुर्ण करण्याचे दायित्व आपण सर्वजण घेवू अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या परिषदेमध्ये डॉ.सुनिल कुटे, डॉ.विप्लव पटनायक, डॉ.प्राजक्ता बस्ते यांनी गोदावरी नदी प्रदुषण मुक्ततेच्या उपाय योजनांबाबत सादरीकरण केले. परिषदे नंतर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत गोदावरी नदीची महाआरती करण्यात आली.
जलसंपदा विभागाची जबाबदारी स्विकारल्या नंतर गोदामातेची महाआरती करुन, कामाला सुरुवात करण्याचा योग आजच्या या परिषदेमुळे आला आहे. गोदावरी नदीचे असलेले एैतिहासिक आणि अध्यात्मिक महात्म्य खुप मोठे असल्याने या नदीच्या प्रदूषण मुक्ततेचा संकल्प आज गोदावरी तिरी करण्याची संधी मिळाल्याचे भाग्य मंत्री ना.विखे पाटील यांनी बोलून दाखविले.



