तब्बल 52 वर्षांनी भेटत जुन्या आठवणीत रमले शालेय मित्र
संगमनेर । प्रतिनिधी । जिल्हा न्यायाधीश, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी संचालक, सरकारी वकील,संशोधक, प्राध्यापक, लेखक,पत्रकार,अभियंता, उद्योजक अशा विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवणारे सर डि.एम पेटीट विद्यालयातील 1972 च्या एच एस सी च्या वर्गातील जुने शालेय मित्र 52 वर्षांनी एकत्र भेटले आणि जुन्या आठवणीत रमून गेले.

खांडगाव येथील खांडेश्वर सांस्कृतिक मंगल कार्यालय येथे महाराष्ट्रभर विखुरलेली ही मित्रमंडळी पाच दशकांनंतर एकत्र आली दिवसभर जुन्या आठवणीत रमून जात पुन्हा मैत्रीला उजाळा दिला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष लहानू भाऊ गुंजाळ यांनी दीप प्रज्वलन या स्नेह मेळाव्याची सुरुवात करून दिली. 52 वर्षानंतर त्या काळातील काही विद्यार्थी आज जगात नसल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्या मित्रांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

यावेळी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,अशोक राहणे, श्रीकृष्ण गीते, सुदर्शन इंदानी, शोभा मणियार,शिरीष गंधे,दीपक क्षत्रिय, मीनाकुमार, सरला नहार, पुष्पा जोशी, प्रकाश गोसावी,चंद्रशेखर जोशी,मंजुषा गंगर, शिरीष गंधे,सुमंत कोल्हे, श्रीकांत कुलकर्णी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.52 वर्षांपूर्वी एकत्र असलेल्या या मित्रांच्या कार्यकर्तुत्वाची तोंड ओळख व्हावी यासाठी अनिल शिंदे यांच्या पुढाकारातून विनय गुणे यांनी लिहिलेली एक परिचय पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी अशोक राहणे चारुदत्त काटकर सतीश गोरे नंदन बाफना जयप्रकाश बेल्हेकर सुनील सराफ चंद्रकांत पिंपरीकर श्रीकांत कुलकर्णी दिलीप आंबेकर विठ्ठल गुंजाळ रमेश पापडेजा शेखर झुंजुर शिवराम बिडवे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना अनिल शिंदे म्हणाले की, 52 वर्षांपूर्वीचा काळ हा शिक्षणासाठी खडतर होता मात्र कठीण परिस्थितीतून यावेळच्या मित्रमंडळीने परिश्रम घेतले आणि त्यातून एक समृद्ध पिढी निर्माण झाली आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहे जीवनाच्या एका टप्प्यावर मागे वळून पाहताना जुन्या आठवणी आणि जुने मित्र हे प्रत्येकाच्या जीवनातील मोठे भांडवल ठरणारे आहे. 52 वर्षानंतर कुटुंबात आणि जीवनात स्थिरता निर्माण झाल्यानंतर जीवनाला आनंद देणारा हा मेळावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तर लहानभाऊ पाटील गुंजाळ म्हणाले की, ऋणानुबंध माणसाला जोडून ठेवतात आणि त्याचे प्रतीक खास्नेह मेळावा आहे. तुम्ही किती मोठे झालात यापेक्षा तुम्ही किती नाती टिकवली हे आज महत्त्वाची आहे.आणि हा भारतीय संस्कार आहे तो या पिढीने जपला असून तोच वारसा या कुटुंबातील पुढच्या पिढीने जपावा असे आवाहन त्यांनी केले. दिवसभर स्नेहभोजन, गप्पा गोष्टी,गाणी,जुन्या आठवणी यामध्ये रमल्यानंतर परतताना अनेकांना अश्रू दाटून आले.



