दुष्काळ आता भूतकाळ होणार’; गोदावरी खोऱ्यात ७८ टीएमसी पाणी आणणार

दुष्काळ आता भूतकाळ होणार‘; गोदावरी खोऱ्यात ७८ टीएमसी पाणी आणणार


जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा निर्धार
कोपरगाव । प्रतिनिधी । “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पाच्या कामांना मोठी गती मिळाली असून, लवकरच याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल,” अशी माहिती जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे स्वागत कोपरगाव येथे आ. आशुतोष काळे यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “यापूर्वी वर्षानुवर्षे जलप्रकल्पांची कामे होऊ शकली नव्हती, अनेकांनी फक्त आश्वासने दिली. निळवंडे सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे लागले. कालवे पूर्ण झाले, म्हणूनच या भागात पाणी येऊ शकले. आता अधिकचे काम करून उर्वरित गावांनाही पाणी देण्याचे त्यांनी आश्वासित केले.” संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जलसंवर्धनाचे कार्य खूप मोठे होते. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच महायुती सरकार काम करीत आहे.” यावेळी मंत्री विखे पाटील यांनी माहिती दिली की, “गोदावरी खोऱ्यात ७८ टीएमसी पाणी आणण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीची उपलब्धता करून दिली असल्याने, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

संवत्सर येथे बोलताना मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील आणि स्व. गणपतराव देशमुख यांनी विशेष पुढाकार घेतला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पाच्या कामांना होणारी सुरुवात म्हणजे ‘दुष्काळ आता भूतकाळ’ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”मंत्री विखे पाटील यांच्यासोबत खा. रामराव वडकुते, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांच्यासह वारकरी, जलयात्री आणि जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत. मार्गात पाण्याचे प्रश्न आणि समस्यांबाबतची निवेदने स्वीकारून मंत्री विखे पाटील संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत आहेत.



