शिर्डी आणि महेश्वरचे नाते अध्यात्माने जोडलेले; जलयात्रेद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर – राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी आणि महेश्वरचे नाते अध्यात्माने जोडलेले; जलयात्रेद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर – राधाकृष्ण विखे पाटील


शिर्डी आणि महेश्वरचे नाते अध्यात्माने जोडलेले; जलयात्रेद्वारे अहिल्यादेवींच्या कार्याचा जागर – राधाकृष्ण विखे पाटील
कोपरगांव । प्रतिनिधी । संपूर्ण जगाला ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जयजयकार करीत, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रा शिर्डीत दाखल झाल्या. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प जलयात्रेच्या निमित्ताने पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गोदावरी नदीचे उगमस्थान असलेले श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थळ असलेले चौंडी येथून यात्रेची सुरुवात करण्यात आली. या दोन्ही यात्रा शिर्डीमध्ये एकत्रित होऊन सोमवारी महेश्वर (मध्य प्रदेश) कडे रवाना होणार आहेत.शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील, आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत यांच्यासह शिर्डीकर ग्रामस्थांनी शहरातील मल्हारी मार्तंड मंदिरात पूजन करून यात्रेचे स्वागत केले. शहरातील प्रमुख मार्गावरून जलकलशाची शोभायात्रा काढून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितीद्वारे देण्यात आला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा आणि कलशाचा रथ यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहे. धनगर नृत्य तसेच मंत्री विखे पाटील यांच्यासह सर्व सहभागी आमदारांचा बसमधील प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. यात्रेच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक सोहळ्यात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जलसंवर्धनाची चळवळ महत्त्वपूर्ण होतीच, पण सांस्कृतिक परंपरेचा वारसा सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला मिळाला. श्री दासगणू महाराजांनी ‘श्री साईनाथ स्तवन मंजिरी’ हा ग्रंथ महेश्वर येथे लिहिला, त्यामुळे शिर्डी आणि महेश्वर नगरीचे नाते अध्यात्माने जोडले गेले असल्याचे” ना.विखे पाटील म्हणाले.



