नैसर्गिक संकट असले तरी, हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजन कटीबध्द होवू – पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
नैसर्गिक संकट असले तरी, हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजन कटीबध्द होवू – पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी ।
सर्वांनी एकत्रित काम करून हा गळीत हंगाम यशस्वी पूर्ण करावा, एकत्रित प्रयत्नामुळेच आपण अल्पवधीमध्ये दहा टनी कारखाना उभारू शकलो. आता ऊस तोडणीसाठी यापुढे हार्वेस्टरचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. नैसर्गिक संकट असले तरी, हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजन कटीबध्द होवू असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठ, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास तांबे, सौ.गीताताई थेटे, कार्यकारी कार्यकारी संचालक महेश कोणापुरे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते. प्रारंभी सौ.अर्चना आणि विजय काशिनाथ म्हसे, सौ.सुरेखा आणि बापूसाहेब चांगदेव कडसकर सौ.हिराबाई आणि भास्कर विठ्ठल पाटोळे तसेच सौ.सुप्रिया आणि विजय उत्तमराव कडू यांच्या हस्ते त बॉयलरचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, निसर्गाचे मोठे संकट आपल्या समोर आहे. पण याही परिस्थितीत ग्रामीण अर्थकारणाला स्थैर्य देणा-या साखर कारखानदारीला पुढे घेवून जावे लागणार आहे. १ नोव्हेंबर पासून कारखाने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने गाळपाचे नियोजन करावे लागेल. ऊस तोडणी पुढे असलेले आव्हाने पाहाता हार्वेस्टरचा वापर करावाच लागणार आहे. सरकार आता हार्वेस्टरसाठी ३५ टक्के अनुदान देत आहे. गाळप निर्धारित वेळेत पुर्ण व्हावे यासाठीच आपण आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढविली आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांनी अतिशय कमी कालावधीत या कारखान्याची उभारणी करुन, विक्रम केला आहे. यामुळे आता गाळप क्षमता वाढेल. त्या दृष्टीने उसाचा पुरवठा कशा पद्धतीने होईल याची काळजी सर्वांनी घ्यावी. विक्रम गळीत हंगामाचे उदिष्ठ सर्वांच्या सहकार्यांने आपण पुर्ण करु.माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखान्याने आजपर्यंत चांगला भाव दिला आहे. यापुढेही चांगला भाव सभासदांना मिळणार आहे. ऊस लागवड वाढवण्याबरोबरच गाळप वाढवण्यावरती सर्वांनी एकञित प्रयत्न करावा रविवार दि. ५ ऑक्टोबर रोजी देशाचे सहकार मंत्री अमितभाई शहा उपस्थित विविध कार्यक्रमांचा आयोजन प्रवरा परिवाराने केले आहे हा कार्यक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी तर आभार संचालक अशोक घोलप यांनी मानले.



