ब्रेकिंग

रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेरकरांच्यावतीने रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरिक सत्कार

जाहिरात मो -7756045359

रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार हा लोककलावंतांचा सन्मान – माजी मंत्री बाळासाहेब थोरात


संगमनेरकरांच्यावतीने रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरिक सत्कार

संगमनेर । प्रतिनिधी । तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. या क्षेत्रात अनेक चढ – उतार सुरू असताना देखील रघुवीर खेडकर यांनी आपले जीवन या कलेसाठी समर्पित केले. त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा राज्यभरातील तमाशासह सर्व लोककलावंतांचा सन्मान असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे संगमनेर मधील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल लोक कलावंत रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.रावसाहेब कसबे, मा.आ. डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, नूर मोहम्मद शेख, प्रा.एस.झेड.देशमुख, डॉ.सोमनाथ मुटकुळे, डॉ.संजय दळवी, हिरालाल पगडाळ,नामदेव गुंजाळ यांच्यासह रघुवीर खेडकर यांचे कुटुंबीय व संगमनेर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेरला कवी अनंत फंदी, लोकशाहीर विठ्ठल उमप, पवळा हिवरगावकर, गुलाबबाई संगमनेरकर, कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर यांच्यासह लोककलावंतांची मोठी परंपरा लाभली आहे. तमाशा ही महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे. अनेक अडचणींवर मात करून ही लोककला पुढे नेण्याचे काम रघुवीर खेडकर यांनी केले आहे. 1857 चा उठाव,भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही या लोककलाकारांचे मोठे योगदान राहिले आहे. कोरोना काळामध्ये रघुवीर खेडकर यांनी कलावंत सांभाळले. आज या मनोरंजन क्षेत्रात मोठी स्पर्धा झाली असून स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन आव्हाने पेलण्यासाठी रघुवीर खेडकर कायमसज्ज असतात त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संगमनेर करांसाठी अभिमानास्पद असून ते आता देशाचे कलावंत झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.तर पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले की, मला आजही वाटत नाही की हा पुरस्कार मला मिळाला आहे. महाराष्ट्रातील रसिकांचे प्रेम आणि संगमनेर करांचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. संगमनेर ही माझी कर्मभूमी आहे आणि या संगमनेरचा मला कायम अभिमान आहे. खूप संघर्ष केला झगडलो. संगमनेरच्या मातीने मला संस्कार दिले. संगमनेर माझी आई आणि बाप आहे. वयाच्या नव्या वर्षी रंगमंचावर आलो आणि तिथून सोंगाड्या झालो माझ्या बहिणीने साथ. ही संगमनेरची भूमी आहे आज हा सोहळा पाहताना आई हवी होती असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

तर डॉ.रावसाहेब कसबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचा पाया घातला आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी हा समर्थ वारसा पुढे चालवला. रघुवीर खेडकर यांनीही लोककला जीवनाचा ध्यास म्हणून जपली. फक्त पुरस्कार देऊन भागणार नाही तर सरकारने तमाशांना आर्थिक अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. तमाशा आणि प्रबोधनाचे काम केले असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अगोदर कांताबाई सातारकर आणि आता रघु भाऊ यांच्या पद्मश्री पुरस्कारासाठी प्रयत्न केले आणि त्यातून संगमनेरला हा पद्मश्री मिळाल्याने आपल्या सर्वांची मान उंचावली असे हि ते म्हणाले.आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, रघुवीर खेडकर यांचा पुरस्कार संगमनेर शहर आणि तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. तमाशा ही लोककला महाराष्ट्राची ओळख असून या पुरस्काराने तमाशा लोककलेचा गौरव झाला आहे. या पुरस्कारामुळे नवीन कलावंतांना प्रेरणा मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी राजेश मालपाणी,एस.झेड.देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सत्यजित तांबे यांनी केले सूत्रसंचालन डॉ.संतोष खेडलेकर यांनी केले तर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर मधील नागरिक, महिला विविध संघटनांचे पदाधिकारी व कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रघु भाऊंचा रसिकांना दंडवत तर कुटुंबीयांचे डोळे पानावले

लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नागरी सत्कार सोहळ्यात पद्मश्री रघुवीर खेडकर यांना शिस्तबद्ध परेडने मानवंदना दिली. तर पुष्पवृष्टी करून त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. नटरंग उभा हे गीत सादर करून त्यांचा मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. यावेळी रघु भाऊ खेडकर यांनी व्यासपीठावरून खाली येत सर्व रसिक प्रेक्षकांना दंडवत घालून अभिवादन केले. यावेळी खेडकर कुटुंबीयांची डोळे आनंद अश्रूंनी पानावले.

बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री म्हणून संगमनेरात यावे

सध्याच्या सरकारला कलेची जाण नाही. हे सरकार जनतेच्या मनातील नाही. येणारे सरकार हे बाळासाहेब थोरात यांचे असून मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसून ते संगमनेरला येतील आणि त्यांना मुख्यमंत्री पाहिल्यानंतरच आपल्याला मरण येऊ अशी भावनिक साथ ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी घातल्यानंतर उपस्थित सर्वांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात साथ दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!