सौ.चैतालीताई काळे यांची ५७ महाराष्ट्र बटालियनएनसीसी ट्रेनिंग कॅम्पला सदिच्छा भेट

सौ.चैतालीताई काळे यांची ५७ महाराष्ट्र बटालियनएनसीसी ट्रेनिंग कॅम्पला सदिच्छा भेट


सौ.चैतालीताई काळे यांची ५७ महाराष्ट्र बटालियनएनसीसी ट्रेनिंग कॅम्पला सदिच्छा भेट
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या सीएटीसी २०७/५७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी वार्षिक ट्रेनिंग कॅम्पला संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या छात्रसैनिकांशी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला. सौ.चैतालीताई काळे यांचे कॅम्पच्या ठिकाणी आगमन होताच एनसीसीच्या विद्यार्थिनींनी एस्कॉर्ट करत त्यांना मानवंदना दिली. कॅम्प कमांडर कर्नल आशिष रैना यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी सुभेदार मेजर राजेंद्र सिंग, शाळेचे प्राचार्य नूर शेख, आयांशदादा काळे व एनसीसीचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सौ.चैतालीताई काळे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे कौतुक केले. ज्या पद्धतीने देशसेवेसाठी आपले जवान कडक प्रशिक्षण पूर्ण करतात अगदी तसेच प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. देशाचा प्रत्येक जवान हा आपल्या जीवावर उदार होऊन राष्ट्राची सेवा करत असतो. त्याच पद्धतीने हे विद्यार्थी प्रशिक्षण घेवून अचानक आपत्ती उद्भवली तर सर्व सामान्य नागरिकांना वाचवण्याचे कार्य करतील असा विश्वास व्यक्त केला. फिजिकल ट्रेनिंग, ड्रिल्स आणि जीवनात आत्मनिर्भर बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिले जात आहे. या कॅम्पला एनसीसी ग्रुप छत्रपती संभाजीनगरचे ग्रुपकमांडर ब्रिगेडियर बरबरे यांनी देखील भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांसोबत घालवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे निसर्गरम्य वातावरण व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबदल आमदार आशुतोष काळे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत त्यांचे आभार मानले.यावेळी एनसीसीचे सर्व विद्यार्थ्यांनी सौ.चैतालीताई काळे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. घरच्या सारखे जेवण व राहण्याची सुविधा मिळत असल्याचे सांगितले. विद्यालयाचा निसर्गरम्य परिसर असल्यामुळे ट्रेनिंगसाठी विस्तीर्ण मैदान व सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. या वार्षिक ट्रेनिंग कॅम्पमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील २८ शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी चे, १५ महाविद्यालयांतील इयत्ता ११ वी व १२ वीचे आणि वरिष्ठ महाविद्यालयाचे मिळून एकूण ४०२ विद्यार्थी-विद्यार्थिनी असून यामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या सहभागी २१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष रायफल फायरिंगचा थरारक अनुभव घेतला.

हा कॅम्प सोमवार (दि.११) पासून ते बुधवार (दि.२०) पर्यंत सुरु राहणार आहे. या १० दिवसांत विद्यार्थ्यांना व्यायाम, परेड, रायफल चालविणे प्रशिक्षण, नकाशा वाचन, जर्निंग डीस्टंन्स, फिल्ड ग्राम, हेल्थ आणि आयजीन या विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सेंन्ट्रल लेक्चरमध्ये आगीपासून बचाव करणे, वन विभागाच्या माध्यमातून जंगलातील प्राण्यांची ओळख आणि प्राण्यांच्या हल्ल्यातील प्राथमिक उपचार प्रशिक्षण, परिवहन विभागाकडून आपत्कालीन वाहतूक नियम आणि वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. देशात व राज्यात अचानक उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत किंवा नैसर्गिक आपत्तीत नागरिकांची सुरक्षा आणि बचाव करण्यासाठी हे विद्यार्थी परिपूर्ण होणार असल्याचे कॅम्प कमांडर कर्नल आशिष रैना यांनी सांगितले.



