के.जी खेमनर यांच्या प्रामाणिक कार्याचा आदर्श शिक्षकांनी घ्यावा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
के.जी खेमनर यांच्या प्रामाणिक कार्याचा आदर्श शिक्षकांनी घ्यावा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

प्राचार्य के जी खेमनर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी । ग्रामीण भागामधील पालकांनीही इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुले टाकले आहेत. मात्र मराठी माध्यमांच्या शाळांमधून होत असलेल्या चांगल्या कामांमुळे अनेक विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळाली आहेत. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांचे प्रॉब्लेम स्वतः त्यांना सोडवावी लागतात. यामुळे ते स्पर्धेमध्ये यशस्वी ठरत असून प्राचार्य के.जी खेमनर यांनी अत्यंत सेवाभावी आणि प्रामाणिकपणे केलेली शिक्षण क्षेत्रातील सेवा सर्व शिक्षकांसाठी आदर्शवत असल्याचे गौरवदगार माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
सिद्धिविनायक लॉन्स येथे सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य केजी खेमनर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर, सौ दुर्गाताई तांबे,रणजितसिंह देशमुख, सौ पुष्पाताई खेमनर, लक्ष्मणराव कुटे, शंकरराव खेमनर, चंद्रकांत कडलग, रिपब्लिकन नेते बाळासाहेब गायकवाड, प्रा बाबा खरात, ॲड लक्ष्मण खेमनर, विक्रम थोरात, रावसाहेब खेमनर, उमेश डोंगरे, उपप्राचार्य संजय सुरसे, एस एम खेमनर, एम वाय दिघे, सौ सुरेखा दिघे, यांच्यासह सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक व विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सह्याद्री संस्थेतील शिक्षकांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन खेमनर दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
के.जी खेमनर यांच्या प्रामाणिक कार्याचा आदर्श शिक्षकांनी घ्यावा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
याप्रसंगी बोलताना मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने के जी खेमनर यांनी आपली सेवा दिली आहे. प्रत्येकाने जर जबाबदारीने आणि प्रामाणिकपणाने काम केले तर देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. कारगिल विजय दिवस आपण साजरा करत आहोत प्रत्येकाने जबाबदारीने काम करा तीच खरी देश सेवा ठरेल असे सांगताना शिक्षण क्षेत्रामध्ये दररोज नवीन आव्हाने येत आहेत. मराठी शाळेच्या माध्यमांना विद्यार्थी संख्येचा प्रश्न आहे. परंतु अनेक जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चांगले काम केल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी आता पुन्हा जिल्हा परिषद शाळेत येत आहेत. यूपीएससी एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही ग्रामीण भागातील हे विद्यार्थी सरस ठरत आहेत. कारण स्वतःच्या अडचणी त्यांना स्वतः सोडवण्याची सवय लागलेली असते. निवृत्तीनंतरही खेमनर यांनी शिक्षण क्षेत्रासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तर मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना ही सामाजिक चळवळ म्हणून केली आहे बहुजन समाजाला पुढे न्यायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगताना या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने सामाजिक चळवळीतून आलेला कार्यकर्ता म्हणून सेवाभावी पणे काम केली पाहिजे. कामाला ईश्वर मानून समर्पित भावनेने के.जी खेमनर यांनी काम केले आहे गणित आणि विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे विषय असून या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान मिळावे याकरता त्यांनी अधिक प्रयत्न केले.
रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, अंभोरे गावच्या शैक्षणिक विकासामध्ये प्राचार्य किसन खेमनर यांचा मोठा वाटा राहिला असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेऊन सरळ व प्रामाणिक हेतू ठेवून केलेल्या कामाचे तालुका भर कौतुक होत आहे. याप्रसंगी प्रा बाबा खरात, दशरथ वर्पे, डॉ जगनर आदींनी मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य संजय सुरशे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश गुंजाळ यांनी केले तर उपमुख्याध्यापिका सौ सुरेखा दिघे यांनी आभार मानले यावेळी सह्याद्री संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अंभोरे पानोडी येथील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहाटे शाळा उघडणारा व बंद करणारा प्रामाणिक मुख्याध्यापक
शिक्षण ही सेवेचे व्रत मानून प्राचार्य के.जी खेमनर यांनी आयुष्यभर काम केले. सकाळी सहा वाजता चतुर्थ कर्मचाऱ्या अगोदर येऊन ते शाळांचे गेट उघडत. तर सर्व विद्यार्थी व शिक्षक गेल्यानंतर स्वतः गेट बंद करत जीवनामध्ये 34 वर्षात फक्त पंधरा दिवस रजा घेतलेल्या या सेवावृत्ती शिक्षकाने अत्यंत प्रामाणिक व विनम्रतेने आणि सरळ भावनेने केलेली सेवा ही तरुण पिढीसाठी आदर्शवत ठरणारी असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.



