कुटूंबामध्ये लक्ष्मी नांदायची असेल तर, घरामध्ये सुनेचा आणि मुलीचा आदर आणि सन्मान करायला शिका – पंडित प्रदिप कुमार मिश्रा
कार्तीक महिन्याचा पुण्यकाळ ओळखून शिवाची साधना करण्याचे भाग्य विखे पाटील परिवाराने सर्वांना दिले
कुटूंबामध्ये लक्ष्मी नांदायची असेल तर, घरामध्ये सुनेचा आणि मुलीचा आदर आणि सन्मान करायला शिका – पंडित प्रदिप कुमार मिश्रा

कार्तीक महिन्याचा पुण्यकाळ ओळखून शिवाची साधना करण्याचे भाग्य विखे पाटील परिवाराने सर्वांना दिले
राहाता । विनोद जवरे ।
सनातन धर्मामध्ये गंगाजलाला मोठे महत्व आहे. देवांचा देव महादेवाच्या डोक्यावरुन वाहून आलेली गंगा ही आपल्या सर्वांना तिर्थासमान आहे. तिर्थाचे आचरण आणि प्राशन हे पुण्यफळासाठी उपयुक्त ठरते. कोणत्याही पवित्र स्थानावरुन आलेल्या जलाचे महत्व कमी होवू देवू नका असे आवाहन पंडित प्रदिप कुमार मिश्रा यांनी शिवपुराण कथेच्या निमित्ताने लाखो भाविकांना केले.

जनसेवा फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेच्या दुस-या दिवशी पंडित मिश्रा महाराज यांनी पवित्र ठिकाणांहून आणल्या जाणा-या तिर्थाचे महत्व विषद करुन, कोणत्याही तिर्थ क्षेत्रावरुन आणलेले जल हे तिर्थासमान असते. शिवपुराण कथा सुध्दा अशा पवित्र तिर्थाचा प्रसाद आहे. कार्तीक महिन्यात शिवपुराण कथेचे असलेले महत्व ओळखून शिर्डी सारख्या पवित्र ठिकाणी या कथेचे आयोजन करणे हे सुध्दा एक फलद्रूप असल्याचे त्यांनी सांगितले.

महादेवाच्या डोक्यावरुन वाहून आलेले गंगाजलच मृत्यु झालेल्या माणसाच्या मुखामध्ये टाकले जाते, याला खुप महत्व आहे. जिथे पवित्र तिर्थ आहे, तिथेच पुण्य असते. परंतू सध्या या पवित्र तिर्थांचा सुध्दा देखावा करण्याचे काम सुरु झाले आहे. कोणत्याही तिर्थाचे महत्व कमी होवू देवू नका असा संदेश देवून, पंडित मिश्रा म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात असाल, पण आपल्या नात्यात परिवारात आणि मैत्रित विश्वास देणे जरुरीचे असते. शिवपुराण कथा सुध्दा आपल्याला भक्तीमय भरोसा देत असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.शिवपुराण कथा सुंदर आहे, यामध्ये एकप्रकारची साधना आहे. माता पार्वतीने सुध्दा ही साधना केली. ही शिवाची साधना आता तुमच्या परिसरात या कथेच्या निमित्ताने होत आहे. आपल्या सर्वांचे भाग्य आहे की, कार्तीक महिन्याचा पुण्यकाळ ओळखून शिवाची साधना करण्याचे भाग्य विखे पाटील परिवाराने सर्वांना दिले. येणा-या दिवाळीच्या पर्वात महादेवाची आराधना करण्यास विसरु नका. शंकराच्या मंदिराजवळ एक दिवा लावा, कार्तीक महिन्याचे पुण्य तुम्हाला मिळाल्या शिवाय राहणार नाही. शिवाचे चरण आणि उच्चारण याला असलेले महत्व स्कंद पुराणामध्ये सांगितले आहे. शिवपुराण कथा ही संपूर्ण जगाचे कल्याण करण्यासाठी आहे.

दिवाळीला आपण लक्ष्मी पुजन करतो, मात्र कुटूंबामध्ये लक्ष्मी नांदायची असेल तर, घरामध्ये सुनेचा आणि मुलीचा आदर आणि सन्मान करायला शिका असा संदेश देवून येणा-या सणाच्या निमित्ताने स्वदेशीला स्विकारा, विदेशीला दुर करा. दिवाळी पर्वाच्या निमित्ताने केली जाणारी खरेदी आपल्या गावातील छोट्या व्यवसायीकाकडून करुन त्यांच्या मातीला आणि मेहनतीला प्रेम द्या. आपल्या नगराचा पैसा नगरातच कसा राहील हा विचार करण्याची आता वेळ आली आहे. देशातील पैसा देशात राहीला तरच, विकसीत आणि आत्मनिर्भर भारत होवू शकेल असा विश्वास पंडित मिश्रा यांनी व्यक्त केला.शिवपुराण कथेच्या निमित्ताने भव्य अशा तीन मंडपांमध्ये लाखो भाविक या भक्तीमय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उत्स्फुर्तपणे येत आहेत. जिल्ह्यासह राज्यातून येणा-या भाविकांची संख्या वाढत असून, सुयोग्य नियोजनामुळे भाविकांना सहजपणे कथा ऐकण्यास मिळत आहे. वाहतूकीचे नियोजन, सुरक्ष व्यवस्था तसेच डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवक स्वयंस्फुर्तीने या नियोजनामध्ये सक्रीयपणे कार्यरत आहेत. कथेच्या दुस-या दिवशी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ.काशिनाथ दाते, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, राजेश परजणे, भास्करराव खर्डे, कैलास तांबे यांच्यासह प्रवरा उद्योग समुहातील विविध संस्थाचे संचालक तसेच जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



