गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला मिळाले – मंत्री विखे पाटील
गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला मिळाले – मंत्री विखे पाटील

लम्पी साथ रोगाच्या संकटात राज्यात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच राज्यातील गोधन वाचविण्यात मोठे यश
राहाता । प्रतिनिधी । लम्पी साथ रोगाच्या संकटात राज्यात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळेच राज्यातील गोधन वाचविण्यात मोठे यश आले. तसेच राज्य गोसेवा आयोगाची स्थापना करुन, गो मातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय करता आल्याचे समाधान जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील पंचकृष्णा डेअरीच्या वतीने दूध उत्पादक शेतक-यांचा सन्मान, विमा प्रमाणपत्राचे वितरण तसेच प्रयोगशाळेचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकूंदराव सदाफळ, माजी संचालक मोहनराव सदाफळ, विरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, अॅड.रघुनाथ बोठे, भाजपाचे अध्यक्ष स्वाधीन गाडेकर, नितीन कापसे, साहेबराव निधाणे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, डेअरीचे संस्थापक सुनिल सदाफळ, सुदर्शन सदाफळ आदि याप्रसंगी उपस्थित होते.आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात सॉरटेड सिमेन्सच्या अती वापरामुळे भविष्यात कालवडींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्माण होणा-या दूधाचे काय होणार याबाबत आत्ताच नियोजन करण्याची गरज व्यक्त करुन, या संदर्भात विभागाच्या मंत्री ना.पंकजा मुंडे यांना आपण सुचित केले आहे. यापुर्वी दूध व्यवसायाला स्थिरता देण्यासाठी राज्य सरकारने यशस्वी प्रयत्न केले आहेत. परंतू सहकारी आणि खासगी दूध संघातील स्पर्धा वाढली. याचा परिणाम दूध उत्पादक शेतक-यांना मिळणा-या भावावर होवू लागला. अशाही परिस्थितीत गाव पातळीवर पंचकृष्णा सारख्या दूध संस्थानी दूध उत्पादक शेतक-यांमध्ये विश्वास निर्माण करुन, उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांनी सुनिल सदाफळ आणि सुदर्शन सदाफळ यांचे अभिनंदन केले.

राज्यात होणा-या दूध उत्पादनाचा विचार केला तर, अमुल उद्योग समुह शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीला. राज्यातील अतिरिक्त दूधाची खरेदी त्यांनी सुरु ठेवावी यासाठी उद्योग समुहाच्या आधिका-यां समवेत आपण सातत्याने बैठका घेतल्या. त्यांनी दूध खरेदी केल्यामुळेच राज्यातील दूध उत्पादक शेतक-यांना मोठा आधार मिळाला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ३५ वर्षानंतर गोसेवा आयोग तसेच गोमातेला राज्य मातेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला मिळाले. लम्पी साथरोगाच्या काळातही राज्यातील सर्व पशुधनाचे मोफत लसिकरण करण्याचा निर्णय झाल्यामुळेच राज्यातील गोधन वाचविण्यात मोठे यश आले. पशुखाद्यामध्ये असलेल्या घटकांची माहीती गोण्यांवर असावी म्हणून राज्यात प्रथमच नियमावली तयार करण्यात आल्याची माहीती ना.विखे पाटील यांनी दिली.
राहाता शहरातील शिवाजी चौकात भारतीय जनता पक्षाच्या वार्ता फलकाचे अनावरण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे अध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर, नितीन कापसे, मुकूंदराव सदाफळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



