ब्रेकिंग

‘साकळाई’ला मंत्रीमंडळाची मान्यता, विखेंच्या पाठपुराव्याला यश

जाहिरात
‘साकळाई’ला मंत्रीमंडळाची मान्यता, विखेंच्या पाठपुराव्याला यश

बोले तैसा चाले…… साकळाई उपसा सिंचन योजनेबद्दल मोठा निर्णय !

अहिल्यानगर । प्रतिनिधी । श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली. 1 एप्रिलला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात वर्षांपूर्वी दिलेला शब्द यानिमित्ताने पूर्ण केला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला बुधवारी यश मिळाले. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवेळीही डाँ. विखे पाटील यांनी साकळाईबाबत शब्द दिला होता. तोच शब्द, आता पूर्ण झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका व श्रीगोंदा तालुक्यातील 32 दुष्काळी गावांसाठीच्या साकळाई योजनेची चर्चा गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरु होती. या योजनेतून या दोन्ही तालुक्यातील 9,600 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचे नियोजन होते. या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणूका लढविल्या गेल्या. परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 एप्रिल 2019 ला वाळकी येथे झालेल्या जाहीर सभेत साकळाई योजनेला मंजूरी देण्याचा शब्द दिला होता.त्यानंतर सध्या पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या योजनेसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. जलसंपदा मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेच्या कामाचा विशेष पाठपुरावा केला. याच योजनेला 1 एप्रिलला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अंतीम मंजुरी मिळाली. आता ही योजना 1,234. 13 कोटी रुपये खर्चून पुढील चार वर्षांत पूर्ण केली जाणार आहे.साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसगाव येथून 4 टप्प्यांत पाणी उचलून ते श्रीगोंदा व नगर तालुक्यातील 32 गावांना दिले जाणार आहे. त्यातून लघू पाझर तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे, गाव तळे भरुन घेतली जाणार आहेत. या योजनेसाठी 1.60 टिएमसी पाणी सिंचनासाठी व 0.20 टीएमसी पाणी हे पिण्यासाठी देण्याचे नियोजन आहे. खरीप हंगामात 15 जुलै ते 15 ऑक्टोंबर या काळात पाणी उपसा करुन जलसाठ्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे.यासाठी म्हैसगाव येथे तत्काळ पंपगृह बांधण्यात येणार आहे. त्यानंतर इतर तीन पंपगृहही बांधले जाणार आहेत. चार पंपगृह व तीन वितरींकाद्वारे एकूण चार टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. हे पाणी तब्बल 208.34 मिटर उपसा करुन चिखली व घुटेवाडी येथील डोंगरावरील वितरण हौदात सोडण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी एकूण 39.71 हेक्टर क्षेत्र आवश्यक असून त्यापैकी 30.22 हेक्टर खाजगी क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक भाषणांमध्ये सांगितले होते की, “ही योजना पूर्ण करणार असू, तर आम्हीच ती पूर्ण करू.” आज अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, स्वर्गीय शिवाजीराव कार्डिले ,माजी आमदार बबनराव पाचपुते आणि आमदार विक्रम पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला आज मान्यता मिळाल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्रकल्पाची सर्व कामे 4 वर्षाच्या कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पुढील चार वर्षांत ही सगळी कामे पूर्ण होतील, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी सांगितले तसेच साकळाई उपसा सिंचन योजनेस मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!