ब्रेकिंग

संगमनेर नगरपरिषदेचा भटक्या श्वानांसाठी राज्यातील पहिला उपक्रम!

संगमनेर नगरपरिषदेचा भटक्या श्वानांसाठी राज्यातील पहिला उपक्रम!

जाहिरात मो-7756045359

निर्बीजीकरण, अँटी रेबीज लसीकरण आणि मायक्रोचिपद्वारे श्वानांची काळजी; नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य

संगमनेर । प्रतिनिधी । भटक्या श्वानांच्या प्रश्नावर संगमनेर नगरपरिषदेने राज्यात पहिल्यांदाच एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आणि अँटी रेबीज लसीकरण केल्यानंतर प्रत्येक भटक्या श्वानाला मायक्रोचिप बसविण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे श्वानांची ओळख ठेवणे, त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांची योग्य काळजी घेणे अधिक सोपे होणार आहे.शहरातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे, रेबीजचा धोका कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने संगमनेर नगरपरिषदेने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये प्राण्यांची काळजी आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व देण्यात आले आहे.

शहरातील विविध भागांतून आणलेल्या प्रत्येक श्वानाची प्रथम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. शस्त्रक्रियेसाठी योग्य असलेल्या श्वानांवर निर्बीजीकरण करून त्यांना अँटी रेबीज लस दिली जाते. मात्र, गर्भवती किंवा नुकतीच पिल्लांना जन्म दिलेले तसेच आरोग्याच्या कारणामुळे शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे श्वान असल्यास त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येते.शस्त्रक्रियेनंतर काही दिवस श्वानांची विशेष काळजी घेतली जाते. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना मायक्रोचिप बसविली जाते. त्यानंतर संबंधित श्वानाला ज्या भागातून आणले होते, त्याच ठिकाणी सुरक्षितपणे सोडले जाते. या उपक्रमामुळे भटक्या श्वानांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन होण्यास मदत होत आहे. तसेच रेबीजचा धोका कमी करण्यास, नागरिकांचा त्रास कमी करण्यास आणि प्राण्यांबाबत संवेदनशील दृष्टीकोन जपण्यासही हातभार लागत आहे.राज्यात अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारी संगमनेर नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद ठरली असून, या उपक्रमाची दखल इतर शहरांकडूनही घेतली जात आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!