माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची 42 गुंठे जागा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची 42 गुंठे जागा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

कारगिल दिनानिमित्त वीर माता व वीर पत्नींचा गौरव
मालपाणी लॉन्स येथे स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्या वतीने कारगिल दिनाच्या निमित्ताने वीरमाता, वीरपत्नी व समाजभूषण पुरस्कारानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात,प्रा.बाबा खरात, किसनभाऊ हासे, जितेश लोढा, युवराज गांजवे,सौ.रोहिणी कोटकर यांच्यासह स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारगिलचा विजय हा इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. पाकिस्तानी कुरापती केल्या त्याविरुद्ध सैनिकांनी अत्यंत कठीण परिस्थितीत लढून हा विजय मिळवला. या युद्धात पाकिस्तानी सैनिक डोंगरावरून लढत होते आणि आपल्याला खालून लढावे लागले. त्यामुळे अडचणी होत्या तरीही भारतीय सैन्याने विजय मिळवला हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. भारतीय सैनिक काश्मीर सारख्या सीमा भागामध्ये ऊन,वारा,पाऊस,थंडी मध्ये रात्रंदिवस पहारा करतात म्हणून देशाचे नागरिक शांत झोपू शकतात. देशाच्या रक्षणाकरता अनेक सैनिकांनी त्याग, बलिदान केला आहे. या सर्वांप्रती देशवासीयांना सदैव कृतज्ञता आणि अभिमान आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात पहिले महायुद्ध व दुसऱ्या महायुद्धातही भारतीय सैनिकांनी मोठे शौर्य दाखवले. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान बरोबर आणि चीन बरोबर झालेल्या युद्धात भारतीय सैन्याने विजय मिळवला. व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्व आहे. त्यांचे स्मारक संगमनेर मध्ये व्हावे याकरता स्वराज्य सैनिक समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वेल्हाळे परिसरात असलेली 42 गुंठे जागा या स्मारक समितीला दिली जाणार असून या ठिकाणी राज्यातील सुंदर असे स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या समितीने वीर माता व वीर पत्नीसाठी केलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी भारतीय सैन्याचे योगदान मोठे राहिले आहे. सैनिकांप्रती कायम आदर व्यक्त करताना नागरिकांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये सैनिकांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याकरता जी समिती काम करते त्यासाठी 42 गुंठे जागा कारखान्याने दिली हे अत्यंत अभिनंदन ही असल्याचे ते म्हणाले. यावेळी भानुदास पोखरकर प्राध्यापक बाबा खरात सुभाष कुडेकर यांनीही मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.जितेंद्र जोशी यांनी केले. तर सुनील थोरात यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील सैनिकांचे कुटुंबीय नागरिक महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारगिल विजय दिवस दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते मालपाणी लॉन्स अशी भव्य रॅली काढली. यावेळी वंदे मातरम, जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमला.
समाजभूषण हरिभाऊ उगले व वीर माता आणि वीर पत्नींचा गौरव
डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले हे संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वच्छतेचे व अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात. त्यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव हा योग्य व्यक्तीचा गौरव असल्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून त्यांना मानपत्र व समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर वीरपत्नी श्रीमती वैशाली बडे, वीरपत्नी श्रीमती वर्षा घोडेकर, वीरपत्नी श्रीमती सुरेखा पवार, वीरपत्नी श्रीमती मनीषा गुंजाळ, वीरपत्नी श्रीमती मंगल वलटे, वीरपत्नी श्रीमती सिंधुताई मनसुख, आणि वीरमाता लहानुबाई ढगे यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरविण्यात आले.



