“वाढदिवस दरवर्षी येईल… पण दादांचा तो सकाळचा फोन पुन्हा कधीच येणार नाही!

“वाढदिवस दरवर्षी येईल… पण दादांचा तो सकाळचा फोन पुन्हा कधीच येणार नाही!


स्व. अजितदादांच्या आठवणीने आमदार आशुतोष काळे गहिवरले; हजारो कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केल्या मनातील भावना
कोपरगांव । प्रतिनिधी । माझ्या प्रत्येक वाढदिवशी सकाळी साडेसहा वाजता अजितदादांचा शुभेच्छांचा फोन यायचाच. अनेक वर्षांची ती प्रेमाची परंपरा होती. पण यंदा तो फोन येणार नाही, ही जाणीव मनाला असह्य वेदना देणारी आहे. वाढदिवस दरवर्षी येईल,पण अजितदादा पुन्हा कधीच परत येणार नाहीत अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी भावना व्यक्त करताच सभागृहातील वातावरण क्षणभर स्तब्ध झाले.

कोपरगाव येथील कृष्णाई बॅन्क्वेट हॉलमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा सोहळ्यासाठी कोपरगाव मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली होती. शुभेच्छा स्वीकारण्यापूर्वी उपस्थितांशी संवाद साधताना स्व. अजितदादांच्या आठवणींनी आमदार काळे यांचा कंठ दाटून आला. यावर्षी वाढदिवस साजरा करण्याची मनापासून इच्छा नव्हती. आपल्या सर्वांचे लाडके नेते स्व. अजितदादा आपल्याला सोडून जाऊन सहा महिने झाले, पण मन अजूनही ते वास्तव स्वीकारू शकलेले नाही. आजही वाटते, दादा कुठेतरी भेटतील, पुन्हा एकदा प्रेमाने विचारपूस करतील. ही आशा मनातून जात नाही, असे ते भावूक स्वरात म्हणाले.ते पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह, जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद पाहता वाढदिवस साजरा करावा की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत होतो. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान राखण्यासाठी आणि जनतेचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला जनतेचे अपार प्रेम आणि विश्वास आहे; पण दुसऱ्या बाजूला दादा नसल्याची पोकळी मनाला सतत अस्वस्थ करते. त्यांच्या शुभेच्छांशिवाय साजरा झालेला हा पहिला वाढदिवस आयुष्यभर वेदना देत राहील. आजही प्रत्येक क्षणी त्यांची आठवण येते, असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला.स्व.अजितदादांच्या कार्याचा उल्लेख करताना आमदार काळे म्हणाले, “दादांनी आम्हाला माणुसकीची वाट दाखवली. जनतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय असल्याचे शिकवले. संकटांशी दोन हात करत खंबीरपणे पुढे कसे चालायचे, याची प्रेरणा दिली. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आणि त्यांचे कार्य माझ्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शक म्हणून राहणार असल्याचे त्यानी सांगितले.यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
दादांशिवायचा पहिला वाढदिवस…
अजितदादांच्या शुभेच्छामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत होत होता परंतु हा दादांशिवायचा पहिला वाढदिवस असल्याचे सांगतांच स्व.अजितदादांच्या आठवणीने आमदार आशुतोष काळे यांचा कंठ दाटून आला. वाढदिवस दरवर्षी येईल, पण अजितदादा परत येणार नाहीत, आणि अजितदादांसारखा माणूस पुन्हा होणार नाही. या शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले आणि उपस्थित हजारो कार्यकर्ते आणि नागरिक देखील भावूक झाले.



