भंडारदरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरण व सुधारणा करण्याच्या कामाचा उद्या शुभारंभ

भंडारदरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरण व सुधारणा करण्याच्या कामाचा उद्या शुभारंभ


जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार
लोणी । प्रतिनिधी । भंडारदरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरण व सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ कोल्हार आणि आश्वी बुद्रुक येथे दिनांक ८ ऑगस्ट रोजी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

भंडारदरा प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा वर्षानुवर्षे जीर्ण झाला आहे. कालव्यांमध्ये निर्माण झालेले अडथळे आणि अतिक्रमणांमुळे कालव्यांमधून पाण्याची वहनक्षमताही कमी झाली असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या. पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा उपयोग लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेसा होत नव्हता. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालव्यांच्या दुरुस्तीला आणि नूतनीकरणाला प्राधान्य दिले आहे.कालव्यांच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन समारंभ दिनांक ८ ऑगस्ट रोजी आश्वी बुद्रुक येथे सकाळी ९ वाजता आणि कोल्हार येथे दुपारी ४ वाजता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शुभहस्ते आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून, या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे-पाटील, डॉ. विखे-पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.राज्यातील महायुती सरकारने धरणांच्या कालव्यांसाठी ‘महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम’ हाती घेतला असून, या माध्यमातून भंडारदरा प्रकल्पांतर्गत येथे येणाऱ्या दोन्हीही कालव्यांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून कालव्यांची दुरुस्ती आणि नूतनीकरण होणार आहे. अनेक वर्षांनंतर कालव्यांच्या दुरुस्तीचे काम होत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही याचा मोठा दिलासा मिळणार आहे.



