स्वतः निधी आणा मग भूमिपूजन करा- सुनील गंगुले

स्वतः निधी आणा मग भूमिपूजन करा- सुनील गंगुले


स्वतः निधी आणा मग भूमिपूजन करा- सुनील गंगुले
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३ आणि दत्तनगर भागातील रस्त्यांसाठी आ.आशुतोष काळे यांनी निधी मंजूर करून आणला आहे. मात्र या विकासकामांचे बेकायदेशीरपणे उद्घाटन करून सत्ताधारी आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम करीत असून सत्ताधाऱ्यांनी आधी स्वतः निधी आणावा आणि मग त्याचे भूमिपूजन करावे. लोकाची कढी, आणि धाऊ धाऊ वाढी अशी गत सध्या कोपरगाव नगरपरिषद सत्ताधाऱ्यांची झाली असल्याचा घणाघात कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनिल गंगुले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.कोपरगाव शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरात अनेक विकासकामे केली असून अनेक विकासकामांसाठीचा निधी मंजूर करून आणला आहे. आ.आशुतोष काळे यांनी शहरात केलेला विकास नागरिकांना दिसत असून नागरिक त्याचा उपभोग घेत आहे. मात्र नगरपरिषद सत्ताधारी आ.आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेल्या विकासाकामंचे श्रेय घेण्यात व्यस्त आहे. नगरपरिषद निवडणुकीत जनतेला दिलेल्या शब्दांपैकी अजून पर्यंत एकही शब्द सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केलेला नाही.

शहरातील प्रभाग क्रमांक ११, १२, १३ आणि दत्तनगर भागातील रस्त्यांचे उद्घाटन सत्ताधाऱ्यांनी छुप्या पद्धतीने केले. या उद्घाटनाची अधिकृत माहिती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मागितली असता. मुख्याधिकाऱ्यांनी हे उद्घाटन अनाधिकृतपणे झाले असल्याचे लेखी दिले आहे. हे उद्घाटन नगरपालिकेची परवानगी न घेता तसेच मुख्याधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना न बोलावता छुप्या पद्धतीने करण्यात आले. या रस्त्यांसाठी सर्व निधी आ. आशुतोष काळे यांनी मंजूर करून आणलेला असताना सत्ताधारी त्याचे फुकटचे श्रेय लाटत असल्याची टीका सुनिल गंगुले यांनी केली आहे.सत्ताधाऱ्यांनी सत्तेत येण्यापूर्वी १०० दिवसांत शहरातील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र आठ ते नऊ महिने उलटूनही एकही ठोस काम पूर्ण झालेले नाही. शहरात गटारींवरील ढाप्यांचा प्रश्न, मुरमाचा घोटाळा आणि मोकाट जनावरांची समस्या गंभीर बनली आहे. जनावरांच्या समस्येमुळे निष्पाप नागरिकांचा बळी गेला तरी प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांना अजूनही जाग आलेली नाही. कारण त्यांचा संपूर्ण वेळ आ.आशुतोष काळेंनी मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन करण्यात जात असल्याचा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मंदार पहाडे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. दत्तनगर भागातील रस्त्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यावेळी कोल्हे गटाचा नगराध्यक्ष होता नव्हता, त्यांची सत्ता पण नव्हती मग त्यांनी निधी कसा आणला? असा खोचक प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.
नगरपरिषदेत तुमची सत्ता आली म्हणून स्वतःची खाजगी मालमत्ता असल्यासारखे काम करू नका. कोपरगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी प्रामाणीकपणे पार पाडीत आहे. तुमच्या चुकीच्या आणि समाज हिताच्या नसलेल्या प्रत्येक निर्णयाला आम्ही यापुढेही विरोध करणार आहे. त्यामुळे सत्तेचा उपयोग नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी करा.- सुनील गंगुले
यावेळी मंदार पहाडे, विरेन बोरावके, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, राजेंद्र वाकचौरे, सचिन गवारे, फाकीर कुरेशी उपस्थित होते.



